श्रीपाद श्रीवल्लभ
श्रीपाद श्रीवल्लभ
जन्म: भाद्रपद शुद्ध ४, गणेश चतुर्थी, शके १३२०, पिठापूर, आंध्रप्रदेश
आई/वडील: सुमती महाराणी /अप्पलराज शर्मा
निवास
क्षेत्र: कुरगड्डी (कुरवपूर) (कर्नाटक राज्य)
संप्रदाय: दत्तावतारी
वेष: ब्रम्हचारी
कार्यकाळ: १३२० -१३५०
समाधी: अवतार समाप्ती अश्विन वद्य १२ शके १३५०, कुरवपूर
चरित्र
ग्रंथ: श्रीपाद चरितामृत
‘श्रीनृसिंह सरस्वती’ हे जरी ‘गुरुचरित्रा’चे नायक असले तरी त्यांचा
पूर्वावतार म्हणून विख्यात असलेले ‘श्रीपाद श्रीवल्लभ’ यांच्या चरित्रातील काही ठळक घटनाच सरस्वती गंगाधरांनी ‘गुरुचरित्रा’त सांगितल्या आहेत. ५, ८,
९ व १० या चार अध्यायात त्या
आढळतात. विशेष म्हणजे गुरुचरित्रात अन्यत्र कोठेही ‘श्रीपाद
श्रीवल्लभां’ चा नामोल्लेखही नाही. ग्रंथकर्त्याचा हेतू प्रामुख्याने श्रीनृसिंह
सरस्वतींच्याच अगम्य लीला वर्णन करण्याचा असल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभांची माहिती
‘गुरुचरित्रा’त केवळ पूर्वपीठिका सांगण्यापुरतीच
आलेली आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार कार्याचे कारण
सांगणाऱ्या ओव्या श्री गुरु चरित्रातील ४९ व्या अध्यायात आल्या आहेत. या ओव्यांप्रमाणे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी महाराजांच्या अवतार
कार्याचे कारण असे आहे की, जगामध्ये कलियुगामुळे विपरित ज्ञान
वाढूलागले. याच्या परिणामाने आत्म ज्ञान प्राप्तीच्या मार्गावर अंधळा आणि बहिरा
असल्या प्रमाणे भक्तांची अवस्था होउन कोणास काहीच कळेनासे झाले. पापाचा आणि
दुराचरणाचा भार भूमिवर वाढू लागला. या भक्तांना गुरु-शिष्य परंपरेच्या आधारे
उपासनेचे मार्ग दर्शन होउन त्या द्वारे गुरुप्रसादाचा लाभ होउन कैवल्य पद मिळावे
म्हणून, परम् कृपाळु श्री दत्तात्रेय-अवधूत महाराजांनी जनांचा उद्धार
करण्यासाठी आणि भूमिभार उतरविण्यासाठी श्रीपाद नावाने नर वेष धारण केला.
त्या ओव्या या प्रमाणे आहेत,
या
कलियुगामाझारीं । ज्ञान जाहले मूढापरी । कांहीं नेणती अंधबधिरीं | मायापाशें वेष्टोनियां || २२२ ||
लाधे
ज्यासी गुरुप्रसाद | त्यासी
प्राप्त होय कैवल्यपद | दूरी
होईल कामक्रोधमद | साध्य
होईल पद-अच्युत || २२४ ||
भूमिभार
उतरावया । जन्म धरिला श्रीपाद राया । दत्तात्रेय-अवधूतरायें । वेष धरिला नरदेहीं
|| २२६ ||
पीठापूर नावाच्या गावात आपस्तंब शाखेतील आपळराज नावाचा ब्राह्मण
सुमती नावाच्या सुलक्षणी पत्नीसह वास्तव्याला होता. ती दोघे दु:खी होती. याचे कारण
असे, की त्यांची सर्व अपत्ये जन्मत:च मृत्युमुखी पडत. कालांतराने त्या सत्शील ब्राह्मण दांपत्याला एक पुत्र झाला; पण तो होता पांगळा. मग दोन वर्षानी त्यांना दुसरा पुत्र झाला; पण तो होता आंधळा. या दुर्दैवाला काय म्हणावे? एकदा वेदशास्त्र संपन्न आपळराजच्या घरी अमावस्येचे दिवशी त्याच्या
पिताश्रींचे श्राद्ध होते. माध्यान्हकाळी साक्षात दत्तात्रेय अतिथीच्या वेषात
त्याच्या दारात उभे राहिले.
‘‘नाना वेष भिक्षुकरूप | दत्तात्रेय येती साक्षेप ||’’
अशी दत्तगुरुंची प्रसिद्धी
पूर्वीपासूनच आहे.
दत्तावतार
श्री श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जन्म पार्श्वभूमी
या कलयुगात भक्ताचा उध्दार करण्यासाठी आद्य देव श्री ब्रम्हा, विष्णु, शिव या त्रिमूर्तीनी श्री दत्तात्रय
याचा अवतार घेतला. ब्रम्हदेव 'चंद्र' झाला. श्रीविष्णू 'दत्त' झाला आणि महेश 'दुर्वास' झाला. काही दिवसांनी चंद्र व
दुर्वास मातेला म्हणाले, "आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा 'दत्त' येथेच राहील. तोच त्रिमुर्ती आहे
असे समज." अनुसूयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास ताप करण्यासाठी निघून
गेले. त्रिमुर्ती दत्त मात्र आई-वडिलांची देव करीत तेथेच राहिले. ब्रम्हदेव आणि
शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्ताच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्त
अत्रि-अनुसूयेचा पुत्र, श्रीविष्णूचा अवतार असूनही
त्रिमुर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व
अत्रिअनुसुयेला देवांनी तो दिला म्हणून 'दत्त'तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु
परम्परेचे मुळं पीठ आहे. श्रीदत्तात्रेय याचे पासून पुढे तिन अवतार झाले प्रथम
श्रीगुरू श्रीपाद श्रीवल्लभ महाराज हा अवतार द्वितीय श्रीगुरू नृसिंहसरस्वती
महाराज व तिसरा अवतार श्री स्वामी समर्थ महाराज हे तिन्ही अवतार श्रीगुरू
दत्तात्रेय याचेच आहेत.
श्रीपाद श्रीवल्लभ यांचा जन्म भाद्रपद शुक्लपक्ष चतुर्थी ला झाला.
गणेश चतुर्थीला झाला. कृष्ण-यजुर्वेद शाखा आपस्तंब सूत्र, भारव्दाज गोत्र भव ब्रह्मश्री घंडिकोटा अप्पालराज शर्मा आणि
महाराणी सुमतीदेवी यांच्या पोटी झाला. या अवताराची माहिती गुरुचरित्रात, पाच,
आठ, नऊ व दहा या चार
अध्यायात आलेली आहे.
श्रीदत्तांचा पहिला अवतार असलेल्या श्रीपाद वल्लभांबद्दल मात्र
खूपच कमी माहिती ठाऊक आहे. भगवान दत्तात्रेय जगदोद्धारासाठी इ. स. १३२० मध्ये
आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात पीठापूर नावाच्या गावात आपळराज नावाचा
एक आपस्तंभ शाखेचा ब्राम्हण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव सुमती. ती मोठी
सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी-अभ्यान्गताची ती मनोभावे सेवा करीत असे. दोघेही
सत्वगुणी होते. ती श्रीविष्णूची आराधना-उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी
श्रीदत्तात्रेय अतिथीवेषात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती.
त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलाविलेले ब्राम्हण अद्याप
यावयाचे होते. दारी आलेला अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत
करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली. त्यामुळे
प्रसन्न झालेल्या अतिथीवेषातील श्रीदत्तात्रेयांनी तीन शिरे, सहा हात अशा स्वरुपात दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष
श्रीदत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिमे श्रीदत्तात्रेयांना
साष्टांग नमस्कार घातला.प्रसन्न झालेले श्रीदत्तात्रेय तिला म्हणाले,
"माग माते जे इच्छिसी । जे जे वासना
तुझे मन पावसी । पावसी त्वरित म्हणतसे॥
"माते, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुला
जे हवे असेल ते माग."
श्रीदत्तात्रेयांनी असे आश्वासन दिले असता सुमती अत्यंत विनम्रपणे
भगवान दत्त्प्रभूंना म्हणाली, "भगवंता, आपण मला 'जननी' म्हणालात तेव्हा
ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले, परंतु ते जगले नाहीत. त्यातून दोन पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक आंधळा आहे व दुसरा पांगळा आहे. ते असून नसल्यासारखे
आहेत, म्हणून मला आपल्यासारखा विश्ववंद्य, परमज्ञानी, देवस्वरूप असा पुत्र व्हवा." सुमतीने अशी प्रार्थना केली असता
प्रसन्न झालेले श्रीदत्त्प्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण होऊन तिला म्हणाले, "माते, तुला मोठा तपस्वी पुत्र होईल.
तुझ्या वंशाचा उद्धार करील. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. परंतु तुम्ही
जो सांगेल तसे करा. नाहीतर, तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे
सगळे दैन्य-दुःख दूर नाहीसे करेल." असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरुपी
श्रीदत्तात्रेय अदुष्य झाले. हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला.
काही कामासाठी बाहेर गेलेला आपळराजा घरी परतला. सुमतीने त्याला सगळी
हकीगत सांगितली. मध्यानकाळी कोणी अतिथी आल्यास त्यला भिक्षा घालण्यास चुकू नको
असेही श्रीदत्तात्रेयांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी
श्रीदत्तात्रेयांचा निवास असतो आणि जे कोणी भिक्षा मागावयास येईल त्याला
श्रीदत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असेही त्यांनी सांगितले होते. सुमतीने
सांगितलेली हकीगत ऐकून आपळराजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, "तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे
पितर आज एकाच भिक्षेने तृप्त झाले. कारण आज आपल्याकडे श्रीदत्तरुपी प्रत्यक्ष
विष्णूच आले होते. हे सुमती, तुझे मातापिता खरोखर धन्य आहेत.
तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे यथाकाली सुमती गर्भवती झाली. नवमास
पूर्ण झाल्यावर एका शुभदिवशी (भाद्रपद शुक्ल चतुर्थी) सुमती प्रसूत झाली. तिअल एक
पुत्र झाला. त्याचे जातकर्म करण्यात आले. आपळराजाने खुप दानधर्म केला. विद्वान
ब्राम्हणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले. 'हा मुलगा दीक्षाकर्ता जगद्गुरु होईल.' असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर
दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला हे ध्य्नात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव 'श्रीपाद' असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय
असून लोकोद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे आपळराजा व सुमती यांने समजले. अत्यंत
आनंदाने ते श्रीपादाचे संगोपन करीत होते.
यथावकाश श्रीपाद सात वर्षांचा झाला. मग आपाळराजाने त्याचे
यथाशास्त्र मौजीबंधन केले. मुंज होताच श्रीपाद चारही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रांत
पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचारधर्म, व्यवहारधर्म, प्रायश्चित्ते, वेदांत इत्यादींचे ज्ञान तो लोकांना
समजावून देऊ लागला. श्रीपादाची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क
झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी आणेल लोक पीठापुरास येऊ लागले.
श्रीपाद सोळा वर्षांचे झाले. माता-पित्यांनी श्रीपादांच्या विवाहाबद्दल चर्चा सुरु
केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले, त्यावेळी ते
म्हणाले,
"मी विवाह करणार नाही. मी वैराग्य
स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापसी ब्रम्हचारी, योगश्री हीच आमची
पत्नी होय. माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार
आहे." हे ऐकून आई-वडिलांना खूप वाईट वाटले. परंतु 'तुला ज्ञानी पुत्र होईल. तो सांगेल तसे वागा.' हे श्रीदत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला
तर काहीतरी विपरीत होईल तेव्हा याला अडवून चालणार नाही. असा विचार करून आई-वडील
त्यांना म्हणाले,
"बाळा, तू आमच्या
म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. पण आम्ही तुला अडवीत
नाही." आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा
श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, "तुम्ही कसलीही चिंता करू नका.
तुम्हाला हवे असेल ते मिळेल." मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूंकडे
अमृतदृष्टीने पहिले. आणि त्याचक्षणी परिस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याप्रमाणे
त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्ती झाली. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला
पाय आले. त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलांवर डोके ठेवले. 'आम्ही आज कृतार्थ झालो, धन्य झालो.' असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून
आशीर्वाद दिला.
"तुम्हाला पुत्रपौत्रांसह सर्वप्रकारची सुखसमृद्धी प्राप्त होईल .
तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही
आई-वडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त
होईल." मग ते आई-वडिलांना म्हणाले, "या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून
तुम्ही शतायुषी व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तरदिशेला जात आहे. अनेक
साधुनानांना मी दीक्षा देणार आहे." सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद
श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले एकेकी गुप्त झाले.
'श्रीगुरुचरित्र' या मराठी ग्रंथामध्ये
त्यांच्याबद्दल फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. दत्तभक्त व सामान्य लोकांना कारंजा
क्षेत्राचे श्रीनृसिंह सरस्वती आणि अक्कलकोट क्षेत्राचे श्री स्वामी समर्थ हे
दत्तगुरूंचे दोन अवातर चांगले माहीत आहेत. पण पहिला अवतार असलेल्या श्रीपाद
वल्लभांबद्दल मात्र खूपच कमी माहिती ठाऊक आहे. या पार्श्वभूमीवर श्रीपाद श्री
वल्लभांच्या अलौकिक कार्याचा तसेच पीठापूरम या त्यांच्या जन्मक्षेत्रांचा थोडक्यात
घेतलेला धांडोळा उद्बोधक आणि अनेकांच्या माहितीत नव्याने भर टाकणारा ठरेल अशी
अपेक्षा आहे. त्यांचे समकालीन असलेल्या शंकर भट्ट यांनी लिहिलेले चरित्र संस्कृत
भाषेत होते आणि नंतर त्याचा तेलुगु भाषेत अनुवाद झाला.
श्री पीठापूर दत्त मंदीर
पिठापुरम येथे १६ तर कुरवपूर येथे
१४ वर्षे अशा अवघ्या ३० वर्षांच्या कालावधीत अद्भूत असे लीलाचरित्र दाखवून त्यांनी
इह-पर लोकातील सर्वांना शाश्वत सुख प्रदान केले. त्यांच्या बाललीला प्रत्यक्ष
भगवान बालकृष्णाच्या लीलेसारख्या अत्यंत मधुर आणि अद्भूत आहेत. पुढे जप, तप,
ध्यान, तपस्या या सर्वांचे फल स्वत:ला न घेता सृष्टीला देत आपल्या
भक्तांची आश्वीव्याप्तीतून सुटका करण्यासाठी त्यांनी आपले तपोबळ सहस्त्रपटीने
वाढविले. आपल्या दिव्य अगम्य आणि मानवाच्या दृष्टीने अनाकलनीय असलेल्या
लीलांद्वारे जनता जनर्दानाच्या उद्धारासाठी त्यांनी आपले आयुष्य घातले. पाण्यावरून
चालणे, व्यंग व्यक्तीस अव्यंगता प्राप्त होणे, उपस्थितांसाठी शिजवलेले अन्न कमी असूनही ते सर्वांना पुरून शिल्लक
राहणे, लांबच्या प्रवासातही दूध, दही, लोणी खराब न होता
नीट राहणे, अंध व्यक्तीस दृष्टी प्राप्त होणे, मृत जीवास
जीवनदान देणे अशा कितीतरी प्रकारच्या चमत्कृतीपूर्ण लीलांनी त्यांचे आयुष्य भरलेले
दिसते. या दिव्य लीलांच्या प्रकटनातून प्रामुख्याने संत-सज्जनांचे संरक्षण, कर्ममार्गाचे आचरण, गर्वहरण, दृष्टांचे निर्दालन, अस्पृश्यता निवारण, सत्कर्माचे प्रचारण, भूदान व अन्नदानाचे महत्त्व, नामस्मरणाचा महिमा, भूत-पिशाच्च बाधांचे निर्मूलन आदि
अनेक गोष्टींचा संदेश दिला. आंध्र प्रदेशातील पीठापुरम येथे या दैवी बालका ने
बालवयात म्हणजे सोळाव्या वर्षाच्या आतच सकळ शास्त्रात विशेषत: वेदान्दात प्रावीण्य
मिळविले. नंतर समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी भारत भ्रमण केले.
पिठापुरम येथील देखण्या मंदिरातील श्रीपाद श्रीवल्लभांच्या
मूर्तींच्या पवित्र दर्शनाने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटते. तेथे भक्तांना अभिषेक
करता येतो. मंदिराच्या प्रांगणात औदुंबर वृक्ष असून तेथे दत्तांच्या पादुका आहेत.
पीठापुरम या पवित्र तीर्थक्षेत्री अत्यंत प्राचीन असे कुक्कुटेश्वराचे दगडी मंदिर
आहे. त्यासमोरच एक तलाव आहे.
पुढील जन्मा विषयी भविष्यवाणी, नृसिंहसरस्वती
आणि स्वामी समर्थ अवतार जन्मसंकल्प
समस्त कल्याणकारी गुणांनी युक्त अशा वासवांबिकेस श्रीपाद प्रभू
म्हणाले ''तुझा संकल्प सिध्द होईल ! मी आणखी चौदा वर्षे म्हणजे या
शरिराला तीस वर्ष येईपर्यंत श्रीपाद श्रीवल्लभ या रूपांतच राहून त्या नंतर गुप्त
होईन. त्यानंतर संन्यास धर्माच्या उध्दाराच्या निमित्ताने नृसिंहसरस्वती
ह्या नावाने ओळखला जाईन. ह्या दुसऱ्या अवतारात ८० वर्षे राहीन, या अवतार समाप्तीनंतर कर्दळी वनात ३०० वर्ष तपोनिष्ठेत राहून
प्रज्ञापुरात (अक्कलकोट) स्वामी समर्थ या नावाने अवतार धारण करीन. अवधूत अवस्थेत
सिध्दपुरुषांच्या रूपाने, अपरिमित अशा दिव्यकांतीने, अगाध लीला, दाखवीन. साऱ्या जगाला धर्म कर्माला
अनुसरून, त्या विषयी आसक्तीरहित करीन.''
भगवान श्रीपाद श्री वल्लभ स्वामींनी आश्विन कृष्ण द्वादशीस अवतार
समाप्त केला.
श्रीपाद श्रीवल्लभ जन्म कथा
दत्तात्रेय आपळराज ब्राह्मणाच्या घरी गेले त्यावेळी
श्राद्धकर्मासाठी आलेल्या ब्राह्मणांचे भोजन व्हावयाचे होते. ते झाल्याखेरीज
अतिथीला भोजन घालणे शास्त्राच्या विरुद्ध होते; परंतु त्या
तेज:पुंज अतिथीला विन्मुख पाठवणेही सुमतीला प्रशस्त वाटले नाही व तिने अगत्याने
दत्तगुरूंना भोजन दिले. सुमतीचा उत्कट श्रद्धाभाव पाहून
दत्तात्रेयांनी आपले खरे स्वरूप प्रकट करून तिला म्हणाले, की ‘‘माते, तुझ्या भोजनामुळे मी खूपच संतुष्ट
झालो आहे. तुला काय हवे ते माग.’’ त्यावर सुमती समयसूचकतेने म्हणाली, की ‘‘आम्हाला एक सुलक्षणी पुत्र व्हावा, अशी आमची इच्छा
आहे. कारण आम्हाला दोन पुत्र आहेत; पण आमच्या दुर्दैवाने एक पांगळा आणि
दुसरा आंधळा आहे.’’
मग दत्तात्रेयांनी प्रसन्न हास्य करून ‘‘तथास्तु’’ असा आशीर्वाद सुमतीला दिला आणि ते
अंतर्धान पावले. अशा रीतीने अमावस्येला अतिथीला भोजन देऊन तृप्त केल्यावर सुमती
यथावकाश गर्भवती झाली. कालांतराने त्या ब्राह्मण दांपत्याला पुत्र प्राप्ती झाली. ‘श्रीपाद’ असे त्याचे नामकरण करण्यात आले.
बीजेच्या चंद्राप्रमाणे श्रीपाद चंद्रकलेप्रमाणे वाढू लागला. सातव्या वर्षी त्याचे मौजीबंधन झाले व तेव्हापासून तो चारही वेद
खडाखड म्हणू लागला. इतकेच नव्हे, तर मीमांसा आणि तर्कावर तो
अधिकारवाणीने भाष्य करू लागला. परिणामी आपळराज व सुमती हे दांपत्य व पीठापूरच्या
पंचक्रोशीतले ग्रामस्थ चकित झाले. यथावकाश श्रीपादच्या सोळाव्या वर्षी विवाहाचा
घाट घालण्याचे आपळराज व सुमती दांपत्याने ठरविले व आपला मानस त्याला बोलून दाखवला; पण त्याने स्पष्ट शब्दांत नकार दिला व तो हसून म्हणाला, की ‘‘वैराग्य हीच माझी स्त्री असून अन्य
स्त्रिया मला मातेसमान आहेत.’’ तसेच "जाणे असे उत्तरपंथा |दीक्षा द्यावया साधुजना ||"
असे आपले अवतारकार्य असल्याचे
श्रीपाद वल्लभांनी त्यांना निक्षून सांगितले. इतकेच नव्हे, तर आपण आता तीर्थयात्रेला घर सोडून जाणार असल्याचा मनोदय आपल्या
माता-पित्यापुढे प्रकट केला. परिणामी त्या दांपत्यावर जणू कुर्हाडच कोसळली.
त्यांनी सर्वार्थाने श्रीपादला कडाडून विरोध केला; पण तो आपल्या
निर्णयापासून तसूभरही ढळला नाही.
पुढे कालियुगाच्या प्रारंभी मलिन झालेल्या सनातन संस्कृतीला उजाळा
देण्याकरिता व भक्त जनांना तारण्याकरिता "श्रीपादश्रीवल्लभ" नामक हा
दत्तात्रेयांचा दुसरा अवतार पिठापूर नामक नगरात झाला. इ. स. १३२०. भक्तांनुग्रहाकारणे
ते तीर्थ यात्रेस निघाले. फिरत फिरत रायचूर जिल्ह्यात असलेल्या
कुरवपूर (कुरगड्डी) येथे येऊन वास्तव्यास राहिले.
श्रीपादश्रीवल्लभांचे दिव्यरूप असे होते- पायात दिव्य खडावा, कटीला कौपिन व मेखला, अंगावर काशाय वस्त्र हातात कमंडलू, गळ्यात रुद्राक्ष माळ, कपाळी भस्म, व मस्तकी जटाजुट धारण केलेली, कमळा प्रमाणे प्रफुल्ल
लोचनांची व मंद स्मितयुक्त चंद्रतुल्य मदन मनोहर वदनाची! श्रीपादप्रभूंची दया, क्षमा शमद मालांकृत भव्य मूर्ती अवलोकन करणारे सर्व लोक धन्य होत!
ते कृष्णामाईत त्रिकाल स्नान करीत असत. रोज प्रातःकाळी संध्येत १००० गायत्री जपत
तर सूर्यनारायणास १०८ नमस्कार घालीत.
मग सुमती कळवळून त्याला म्हणाली, की ‘‘अरे श्रीपादा, तू आम्हाला सोडून गेल्यावर तुझ्या
पांगळ्या आणि आंधळ्या भावंडांकडे कोण बघणार? आम्ही काही जन्मभर त्यांना पुरणार
नाही.’’ मंद स्मित करीत श्रीपादाने आपल्या दोन्ही बंधूंना हाक मारली आणि
त्या दोघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि काय आश्चर्य! पांगळा धावू लागला आणि
आंधळ्याला दृष्टी आली. मग श्रीपाद जड अंत:करणाने निरोप घेऊन तीर्थयात्रेला रवाना
झाले. श्रीक्षेत्र काशीला मनोवेगाने जाऊन तेथे गुप्त रूपाने राहिले. तेथून पुढे
बद्रिकाश्रमात नारायणाचे दर्शन घेऊन गोकर्णास आले. तेथे तीन वर्षे वास्तव्य करून
ते कुरवपुरास प्रकट झाले.
गंगा-यमुना या पवित्र नद्यांच्या तिरावर वसलेल्या कुरवपुरात एक
वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण वास्तव्याला होता. त्याच्या पत्नीचे नाव ‘अंबिका’. ते ब्राह्मण दांपत्य दु:खी होते.
त्यांची अपत्ये जगत नसत. कालांतराने त्यांना एक पुत्र झाला; पण तो मतिमंद होता. त्याचे विद्याभ्यासात लक्ष नव्हते. तो मतिमंद
असला तरी जात्याच हूड होता. वेदाध्ययन न करता दिवसाचा बहुतेक वेळ तो गावात
उनाडक्या करण्यात घालवत असे. परिणामी ब्राह्मण त्याला मारझोड करीत असे. तो रडू
लागताच ब्राह्मणी आपल्या पतीला म्हणे, की ‘‘त्याला मारण्याचे
तुम्ही थांबवले नाही तर मी प्राणत्याग करीन.’’
ब्राह्मणाचा निरुपाय झाला. त्याने मारझोड थांबवली; पण अल्पावधीतच किरकोळ आजाराचे निमित्त होऊन तो हे जग सोडून गेला.
अंबिका, पतीच्या वियोगामुळे अतिशय दु:खी झाली. पित्याच्या मृत्यूचा त्या
वांड मुलावर यत्किंचितही परिणाम झाला नाही. शेवटी ती एकुलता एक मुलगा अत्यंत मूढ
निघाला म्हणून जीवनाला वैतागून गंगेत मुलासह देहत्याग करण्यास सिद्ध झाली होती.
श्रीपाद श्रीवल्लभही त्यावेळी गंगास्नानासाठी तेथे आले होते. त्यांची तेजोमय, प्रसन्न मूर्ती पाहून देहत्यागापूर्वी त्यांचे दर्शन घ्यावे असा
विचार करुन अंबिका मुलासह त्यांचेजवळ आली व आपल्या प्राणत्यागाचा हेतू प्रकट करून
त्यांना म्हणाली,
की ‘‘स्वामी, पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा व सर्वांना पूज्य तसेच, वंदनीय पुत्र मला होऊ दे.’’ त्यावर श्रीपाद श्रीवल्लभ तिला
म्हणाले, की ‘‘शनिप्रदोषाच्या दिवशी म्हणजे ज्या
शनिवारी त्रयोदशी असेल त्या दिवशी, तू शंकराची मनोभावे पूजा कर. तुझी
मनोकामना पूर्ण होईल.’’
श्रीपाद श्रीवल्लभांनाच कालांतराने ‘श्रीनृसिंह सरस्वती’ या नावाने अवतार घ्यावयाचा होता व त्याची ही पूर्वपिठीका अशा
प्रकारे तयार झाली होती आणि ती सांगण्यासाठीच श्रीपाद श्रीवल्लभांचे चरित्र ‘गुरुचरित्रा’च्या कर्त्याने म्हणजेच सरस्वती
गंगाधरांनी आपल्या ग्रंथात दिले आहे.
‘‘आणिक कार्य कारणासी | अवतार घेऊ परियेसी |
वेष
धरुनि संन्यासी | नाम
नरसिंहसरस्वती ||’’
या ओव्या या दृष्टीने चिंतनीय आहेत.
कुरवपुरात घडलेल्या आणखी एका
विचित्र घटनेचे धागेदोरेही श्रीपाद श्रीवल्लभांच्या पुढील अवतारपटाशी जोडले
जावयाचे होते. कुरवपुरात एक रजक (म्हणजे धोबी) राहात होता. रोज प्रात:काळी कपडे
धुण्यासाठी घाटावर आल्यावर त्याला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घडत असे. त्यांच्या
तेजोमय मूर्तीला रोज भक्तिभावाने वंदन करून तो कपडे धुण्याचे काम करत असे.
एक दिवस त्या रजकाच्या उत्कट भक्तिभावावर संतुष्ट होऊन ‘‘सुखे राज्य करी आता’’ असा आशीर्वाद श्रीपाद श्रीवल्लभांनी
त्याला दिला. त्यावर त्या रजकाने ‘‘राज्योपभोग आपण पुढील जन्मी भोगू’’ असे श्रीपाद श्रीवल्लभांना विनम्रपणे सांगितले, तेव्हा ‘‘तू पुढील जन्मी राजा होऊन मला
भेटशील’’ असे श्रीपाद श्रीवल्लभ त्याला म्हणाले.
यावरून असे स्पष्ट दिसते, की ‘वासना’ या मोक्षमार्गात अडथळा निर्माण करतात. त्या दरीद्री रजकाला, गंगेत जलक्रीडा करणार्या यवन राजाचे वैभव पाहून राज्योपभोगाची
वासना निर्माण झाली ती ओळखूनच श्रीपाद श्रीवल्लभांनी ‘‘तू पुढील जन्मी राजा होशील’’ असा वर त्या रजकाला दिला. वासनांचा
क्षय केवळ हट्टाने होत नाही, तो भोगूनच करावा लागतो.
‘‘निववावी इंद्रिये सकळ | ना तरी मोक्ष नव्हे निर्मळ |
बाधा
करिती पुढती केवळ| जन्मांतरी
परियेसा ||’’
या ओव्यांचे मर्म हेच आहे.
तद्नंतर आश्विन वद्य १२ शके १३५० या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ गंगेत
अदृश्य झाले; परंतु त्यानंतरही आपण अदृश्य रूपाने भक्तांच्या पाठीशी उभे आहोत, याचे प्रत्यंतर दाखविण्यासाठी श्रीपाद श्रीवल्लभांनी वल्लभेश नामक
एका भक्ताला चोरांच्या तावडीतून वाचविल्याची एक आश्चर्यजनक कथा गुरुचरित्राच्या
दहाव्या अध्यायात आहे.
श्रीपाद श्रीवल्लभांविषयी ‘गुरुचरित्रा’त याहून अधिक माहिती मिळत नाही. तथापि, त्यांनीच कालांतराने ‘श्रीनृसिंह सरस्वती’ या नावाने नवा अवतार धारण केला, अशी दत्तभक्तांची
दृढ श्रद्धा आहे व तिला पोषक असे अनेक भक्कम पुरावे श्रीनृसिंह सरस्वतींच्या दिव्य
चरित्रात वाचावयास मिळतात. श्रीपाद श्रीवल्लभ आजही सूक्ष्मदेहाने खर्या भक्तांचे
सर्वतोपरी रक्षण करीत असतात यात मुळीच संशय नाही.
कलियुगातील दत्तात्रेयांचे प्रथम अवतार म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ
यांनी तेराव्या शतकात जन्म घेतला, असे मानले जाते. समाजातील विकृती
नाहीशी व्हावी,
मुस्लीम आक्रमणाने गांजलेली आणि
विस्कळीत झालेली समाजाची घडी नीट बसावी, धर्माची आणि संस्कृतीची पुन:स्थापना
व्हावी, या उद्देशाने श्रीदत्तात्रेयांनी हा अवतार घेतला. त्या वेळी समाज
अत्यंत दुर्बल झाला होता. अशा वेळी इ.स. १३२० मध्ये श्रीदत्तात्रेयांनी श्रीपाद
श्रीवल्लभ अवतार धारण करून खूप मोठे कार्य केले. त्यांचा आयुष्यकाल तीस वर्षांचा
होता. आंध्रप्रदेशातील गोदावरी जिल्ह्यातील पीठापूर हे त्यांचे जन्मठिकाण. तेथून
ते कुरवपूर या ठिकाणी गेले. श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या अवतारकाळात अनेक
अगम्य लीला केल्या. या अवतारानंतरच श्रीदत्त संप्रदायाची भारतामध्ये अतिशय जोमाने
वाढ झाली. श्रीपाद श्रीवल्लभ यांना मानणारी मोठी परंपरा आंध्रप्रदेशाबरोबरच
कर्नाटक आणि महाराष्ट्र तसेच संपूर्ण भारतात पसरली आहे. यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ आणि दत्तात्रेय हेच आराध्य दैवत आहे. ‘श्रीपादराजं शरणं प्रपद्ये’ हा त्यांचा प्रमुख इष्ट मंत्र आहे.
श्रीपादांची भक्तांना सांगितलेली बारा
अभय वचने
२) मनो वाक् काय कर्मणा मला समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल
घालून संभाळ करतो.
३) श्री पीठिकापुरममध्ये मी प्रतिदिन मध्यान्ह काळी भिक्षा स्वीकारतो.
माझे येणे दैव रहस्य आहे.
४) सतत माझे ध्यान करणाऱ्यांचे कर्म, ते कितीही
जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो.
५) (अन्न हेच परब्रह्म-अन्नमोरामचंद्राय) अन्नासाठी तळमळणाऱ्यांना अन्न
दिल्यास, मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो.
६) मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे. माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी
तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते.
७) तुमचे अंत:करण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो.
८) तुम्ही ज्या देवता स्वरूपाची आराधना कराल, ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल.
९) तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोचते. माझा अनुग्रह/आशिर्वाद तुम्ही
आराधिलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे, तुमच्या सद्गुरुद्वारे तुम्हाला
प्राप्त होतो.
१०) श्रीपाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही. सकल देवता स्वरूप
समस्त शक्तिचे अंश मिळून माझे विराट स्वरूप, अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू
शकेल.
११) श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे. जे महायोगी, महासिद्धपुरुष माझे नित्य ध्यान करतात ते माझेच अंश आहेत.
१२) तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्ममार्गाचा, कर्म मार्गाचा बोध करतो. तुम्ही पतित होऊ नये म्हणून सदैव मी तुमचे
रक्षण करतो.
।।
घोरकष्टोद्धरणस्तोत्रम् ।। अन्वय व संक्षिप्तार्थ
कुरवपुर दत्त मंदीर
भावग्राह्य
क्लेशहारिन सुकीर्ते, घोरात्कष्टात
उध्दरास्मान नमस्ते ।।१।।
अन्वय: भो देवाधिदेव, श्रीदत्त, श्रीपाद श्रीवल्लभ, भावग्राह्य, क्लेशहारिन् सुकीर्ते, त्वं सदैवास्मान् पाहि, अस्मात, घोरात्कष्टात् उध्दर ते नम: ।।१।।
संक्षिप्तार्थ: हे देवाधिदेवा श्रीदत्ता, श्रीपादा, श्रीवल्लभा, भावग्राह्या – क्लेशहारका सुकिर्ते, तुं सर्वदा आमचे रक्षण कर. आमचा या
घोर कष्टातून उध्दार कर. तुला नमस्कार असो. ।।१।।
त्वं नो माता, त्वं पिताप्तो धिपस्त्वं, त्राता योगक्षेमकृत, सदगुरुस्त्वम् ।
त्वं
सर्वस्वं, नः
प्रभो विश्र्वमूर्ते, घोरात्कष्टात
उध्दरास्मान नमस्ते ।।२।।
अन्वय: हे अप्रभो विश्र्वमुर्ते, त्वं नो माता त्वं न: पिता त्वं न:
आप्त: त्वं नो अधिप: त्वं न: योगक्षेमकृत् त्वं न: सर्वस्वं अस्मान्
घोरात्कष्टादुध्दर ते नम: ।।२।।
संक्षिप्तार्थ: हे अप्रभो (नाहि प्रभु ज्याला, तो अप्रभु म्हणजे
सर्वप्रभु) सर्वप्रभो विश्र्वमुर्ते तू आमची माता, पिता, मालक, योगक्षेम चालविणारा सद्गुरु व
सर्वस्व आहेस; म्हणुन आमचा या घोर कष्टातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ।।२।।
पापं तापं व्याधि माधिं च दैन्यं, भीतिं क्लेशं त्वं हराशु त्वदन्यम्
।
त्रातारं
नो वीक्ष ईशास्तजूर्ते, घोरात्कष्टात
उध्दरास्मान नमस्ते ।।३।।
अन्वय: हे ईश त्वं पापं तापं व्याधिं आधिं दैन्यं भीतिं क्लेशं च आशु हर, हे अस्तजुर्ते त्वदन्यं त्रातारं नो वीक्षे अस्मान् घोरात कष्टात्
उद्धर ते नम: ।।३।।
संक्षिप्तार्थ: हे ईश्वरा, तू आमचे पाप, ताप,
शारीरिक व्याधी, मानसिक आधी, दारिद्य्र, भीती व क्लेश यांचे सत्वर हरण कर. हे पीडा नाशका, तुझ्यावाचून अन्य त्राता आम्हाला दिसत नाही. याकरिता आमचा या घोर
संकटातून उद्धार कर. तुला नमस्कार असो. ।।३।।
नान्यस्त्राता नापि दाता न भर्ता, त्वत्तो देव त्वं शरण्योकहर्ता ।
कुर्वात्रेयानुग्रहं
पूर्णराते, घोरात्कष्टात
उध्दरास्मान नमस्ते ।।४।।
अन्वय: हे देव त्वत्तोन्यस्त्राता न, दाता न, त्वं शरण्य : अकहर्तासि, हे आत्रेय, अनुग्रहं कुरु हे पूर्णराते घोरात्कष्टादस्मानुध्दर ते नम : ।।४।।
संक्षिप्तार्थ: हे देवा, आम्हास तुझ्याहून दुसरा त्राता
नाही. दाता नाही. भर्ताही नाही. तू शरणागत-रक्षक व दु:खहर्ता आहेस. हे अत्रेया, आमच्यावर अनुग्रह कर. हे पुर्णकामा, घोर संकटापासून
आमचा उद्दार कर. तुला नमस्कार असो. ।।४।।
धर्मे प्रीतिं सन्मतिं देवभक्तिं, सत्संगाप्तिं देहि भुक्तिं च
मुक्तिम् ।
भावासक्तिं
चाखिलानन्दमूर्ते, घोरात्कष्टात
उध्दरास्मान नमस्ते ।।५।।
अन्वय: हे अखिलानंदमूर्ते दे, धर्मे प्रीतिं सन्मतिं भक्तिं
सत्संगाप्तिं भुक्तिं मुक्तिं भावासक्तिं च देही, अस्मान्
घोरात्कष्टादुध्दर ते नम: ।।५।।
संक्षिप्तार्थ: हे अखिलानंदकारकमूर्ते देवा, आम्हाला धर्माचे ठिकाणी प्रीती, भुक्ति, मुक्ति व भक्तिचे ठिकाणी आसक्ती दे.
सर्व घोर कष्टातून आमचा उद्धार कर. तुझे चरणारविंदी आमचे शतश: प्रणाम असो. ।।५।।
श्र्लोक पंचक मेतद्यो लोकमंगल
वर्धनम् ।
प्रपठेन्नियतो
भक्त्या स श्रीदत्तप्रियो भवेत् ।।
अन्वय: लोकमङ्गलवर्धनमेतच्छलोकपंचकं नियत: । य: भक्त्या प्रपठेत् स
श्रीदत्तप्रियो भवेत् ।।६।।
संक्षिप्तार्थ: श्री सद्गुरुमहाराज म्हणतात, “सर्वांचे कल्याण करणारे हे
श्लोकपंचक नियमपूर्वक नित्यश: भक्तिभावाने जो पठण करील तो मनुष्य, श्रीदत्ताला अत्यंत प्रिय होईल व श्रीदत्तही उत्तरोत्तर या भक्ताला
प्रिय होईल”, असा माझा आशीर्वाद आहे ।।
इति श्रीमद वासुदेवानंद सरस्वती
कृतं घोरकष्टोध्दरणस्तोत्रं संपूर्णम् ।।
श्रीपाद श्रीवल्लभ
|| श्रीपाद अष्टक ||
वेदान्तवेद्दोवर योगीरूपं | जगत्प्रकाशं सुरलोकपूज्यं |
इष्टार्थसिध्दि
करूणाकरेशं | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये ||१
||
योगीशरूपं
परमात्मवेषं | सदानुरागं
सहकार्यरूपं |
वरप्रसादं
विबुधैकसेव्य | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये || २ ||
काषायवस्त्रं
करदंडधारिणं | कमण्डलुं
पद्मकरेण शंखम् |
चक्रंगदांभूषित
भूषणाढ्यम् | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये || ३ ||
भूलोकसारं
भूवनैकनाथ | नाथादिनाथं
नरलोकनाथम् |
कृष्णावतारं
करूणाकटाक्षं | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये || ४ ||
लोकाभिरामं
गुणभूषणाढ्यम् | तेजोमुनि
श्रेष्ठमुनिर्वरेणयं |
समस्त
दुःखानि भयानि शांतं | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये || ५ ||
कृष्णासुतीरे
वसतिप्रसिध्दं | श्रीपादश्रीवल्लभ
योगिमूर्तिम् |
सर्वैर्जनैश्चिंतित
कल्पवृक्षं | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये ||६
||
मंत्राब्धिराजं
युतिराजपुण्यं | त्रैलोक्यनाथं
जनसेव्यनार्थं |
आनंदचितं
अखिलात्मतेजं | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये ||७
||
मंत्रानुगम्यं
महानिर्वितेजं | महत्प्रकाशं
महाशांतमूर्तिम् |
त्रैलोक्यचित्तं
अखिलात्मतेजसं | श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये ||८
||
श्रीपादष्टकमिदं पुण्यं
प्रातरुत्थाय यः पठेत् || कोटिजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति ||
॥ श्रीदत्तत्रेयार्पणमस्तु ॥
श्रीपाद
श्रीवल्लभांचे बोल व आशिर्वाद
श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार
पूर्णपणे नाहिसा झाला पाहिजे. ज्या वेळेस आपले ह्दय काम, क्रोध, लोभ, मोह, मद,
मत्सर, या षडरिपूतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा
होण्यास मुळीच विलंब लागणार नाही.
सृष्टी मधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदन होत असते. भिन्न भिन्न
प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ति-व्यक्ति मध्ये आकर्षण तर काही मध्ये विकर्षण होते.
पुण्य कर्म, उत्तम आचार आणि विचारांनी स्थूल, सूक्ष्म आणि कारण
देहात पुण्यरूपी प्रकंपन होते.
तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केले असते तर एका दाण्यासाठी हजार
दाणे आमच्याकडून मिळाले असते. परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही. तेव्हा
तुम्हाला आम्ही काहीच देऊ शकत नाही.
ब्राम्हण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबध्द असावा. वैशांनी
व्यवसाय, व्यापार, गाईचे रक्षण, क्रय विक्रय आदि व्यवहार करावे. शूद्रानी प्रेमस्वरूप राहून सेवा
करावी. भगवंताच्या भक्तिसाठी मात्र वर्ण, जात, कुळ, श्रीमंत, गरीब, स्त्री, पुरूष असा भेदभाव नसतो. भगवंत भक्तांचा केवळ प्रेमभाव, श्रध्दा, दृढ विश्वास पाहतो. मानव कोणत्याही वर्णात जन्माला आला तरी त्याने
स्वधर्मानुसार कर्म करावे.
श्रीदत्तप्रभू अल्पसंतोषी आहेत. थोडया सेवेवर ते भक्तास प्रसन्न
होऊन अमाप फळ देतात. श्रीदत्तांच्या नावाने कोणाही व्यक्तीस अन्नदान केल्यास व जर
ती व्यक्ती योग्य असल्यास त्या अन्नदानाचे विशेष फळ लाभते. इच्छित वस्तूची समृध्दी म्हणजेच लक्ष्मीचा कृपा कटाक्ष.
श्री पीठीकापूर सुध्दा माझे अत्यंत प्रिय स्थान होईल. माझा जन्म, कर्म अत्यंत दिव्य आहे, ते एक गोपनीय रहस्य आहे.
श्रीपादप्रभू सर्वात प्रथम आपल्या भक्ताचे कासवाच्या पिलाप्रमाणे
पालन करतात. कासव आपल्या पिलापासून किती दूर असले तरी त्याच्या विचार तरंगानेच
त्या पिलांचे रक्षण होते. थोडी उन्नती झाल्यावर मांजराचे पिलाप्रमाणे भक्तांचे
पालन करतात. दुसरी सगळी चिंता सोडून निरंतन माझेच ध्यान करणा-यांचा मी दास
असतो.
कोणी कितीही मोठा असला तरी पूर्वजन्म कर्मफल अनिर्वाय असते. सगळी
सृष्टि शासनाचे उल्लंघन न करता चालत आहे. स्त्रियांना पूजेचे फळ म्हणून नवरा
मिळतो. दानाचे फलस्वरूप मुलेबाळे होतात. सर्वदा दान सतपात्री करावे. दान घेणारे
सतपात्री नसतील तर किंवा दानास योग्य असे नसतील तर अनिष्टच संभवते. दान करताना माणसाने अहंकार रहित होऊन दान करावे. तेव्हाच त्याचे
चांगले फळ मिळेल.
सा-या जगाला धर्म कर्माला अनुसरून त्या विषयी आसक्तिरहित करीन.
स्मरण, अर्चन केल्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभ प्रभूंशी अनुसंधान घडते.
खगोलातील ग्रहांना जीवांशी मित्रत्व किंवा शत्रुत्व असे नसतेच.
ग्रहांच्यामुळे येणारे सूक्ष्मकिरण अशुभ फळ देणारे असल्यास त्यांच्या दोष
निवारणासाठी मंत्र,
तंत्र, यंत्राने काही फळ न दिल्यास, जप, तप, होमाचा आश्रय घ्यावा. या उपायाने सुध्दा उपशमन न झाल्यास श्रीगुरू
पादुकांना शरण जावे. श्रीचरण सर्वशक्ति संपन्न असतात.
कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रितीने काम करीत असतो. ह्या सत्याची
जाणिव होऊन जीवाने सदैव सत्कर्मच करावे. दुष्कर्मच कधीही करू नये. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मजन्मांतराच्या कर्म
प्रवाहात वाहत जात असतो. मरतेवेळी ज्या संकल्पाने प्राणत्याग होतो त्याला अनुसरून
त्याला दुसरा जन्म मिळतो. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने
पापकर्म केल्यास पापांचे फळच प्राप्त होते. संकल्पाने पुण्यकर्म केल्यास
पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते.
ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, किर्तन होते, त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म
रूपाने संचरण करीत असतात, हे अक्षर सत्य आहे. भाजलेल्या
बीजांचे पुनरंकुरित न होणे हा सृष्टीचा धर्म आहे. भाजलेल्या बीजांना पुनरंकुरित
करणे हे सृष्टिकर्त्याचे शक्तिसामर्थ्य आहे.
मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडात व्याप्त असलेले एकमेव
तत्वमीच आहे. दिग हेच वस्त्र म्हणून दिगंबर आहे. जे कोणी त्रिकरणशुध्दीने दत्त
दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा नरसिंहसरस्वती दिगंबरा म्हणून भजन, कीर्तन करतात येथे मी सूक्ष्म रूपाने असतो.
सत्पुरूषांस, योगीयास दान-धर्म केल्याने, दैवी कृपेमुळे पाप कर्मांचा क्षय होतो. देवतामूर्ती पुण्यस्वरूप
असून त्यांच्या ठाई करूणा असल्या कारणाने आपले पाप कर्मफल त्यांच्याकडे ओढून घेतात
व त्यांचे पुण्य आपणास देतात.
अवतारी पुरूष जन्माला यायचे म्हणजे त्या वंशात पूर्वीच्या ऎंशी
पिढ्यांनी पुण्य संचय केलेला असतो. तसेच अवतारी पुरूषाचे गुरू होणा-या व्यक्तिचा
वंश परम पवित्र पुण्यवान असावा लागतो. या सृष्टीमध्ये प्रत्येकजण हा सेवकच असतो.
मी जेव्हा प्रसन्न होतो तेव्हा त्या सेवकाला सेवेचे जास्ती फळ प्रदान करतो. परंतु
अप्रसन्न झाल्यास सेवेचे कमी फळ देतो.
ब्रह्मदेवाने लिहिलेल्या प्रारब्धास कोणी बदलू शकत नाहीत. परंतु
श्रीदत्त प्रभूंच्या भक्तांसाठी मात्र श्रीदत्त ब्रम्हदेवाला आदेश देऊ
शकतात.
श्रीपादश्रीवल्लभ
व ज्योतिष शास्त्र
गुरुदत्त
भट्टाचा वृतांत -ज्योतिष्य शास्त्रा प्रमाणे भक्ताच्या पत्रिकेतील शुभफल देणारे
एकमेव श्रीपाद प्रभू (संदर्भ
श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत अध्याय
२२)
गुरुचरण, कृष्णदास आणि मी (शंकरभट्ट) श्रीपाद
प्रभूंच्या सम्मुख अद्वितीय आनंदाच्या सागरात विहार करीत होतो. गुरुदत्त नावाचा एक
ज्योतिषी श्री गुरुदेवांच्या दर्शनासाठी आला होता. श्रीपाद प्रभूंनी त्याचा यथोचित
सन्मान केला. एका निवांत जागी बसून सत्संग करा असा त्यांनी आदेश दिला. आमचे संभाषण
ज्योतिष शास्त्राकडे वळले. मी दत्त महाशयाना म्हणालो ''महाराज, ज्योतिष्य शास्त्रात सांगितलेले फळ
खरेच असते का? फळात बदल करता येतो का? मानवजीवनातील पूर्व कर्मे निर्देशित
असतात?''
यावर श्री दत्त गुरुदत्त भट्ट म्हणाले,'' 'भ' चक्र ही नक्षत्र कक्षा आहे. हिची सुरवात अश्विनी नक्षत्रा पासून
होते. हे नक्षत्र स्थल निर्देश करण्यासाठी चैत्र पक्ष आहे. आणि रैवतपक्ष नांवाची
दुसरी पध्दत्त आहे. रेवतीनक्षत्र असणाऱ्या स्थानापेक्षा आठ कळा कमी असलेल्या
स्थानामुळे ते ग्राह्य नाही. अश्विनीनक्षत्र गोल ओळखण्यास कठीण आहे. परंतु १८०
अंशावर असलेले चित्रानक्षत्र याचा एकच गोल प्रकाशवंत असून स्फुट असल्याने त्यात
सहा (६) ही राशी मिळविल्यास ती अश्विनी होऊन चैत्रपक्ष म्हणून ग्राह्य मानली जाते.
अश्विनीनक्षत्र ''तुरग मुखाश्विनी श्रेणी'' तीन गोल म्हणून स्पष्ट करण्यात आली आहे.
श्रीपाद श्रीवल्लभ चित्रा नक्षत्रावर जन्म घेण्यास एक विशेष कारण
आहे. तीन गोल एकत्र असलेले अश्विनी नक्षत्र म्हणजे त्यांचे स्वरूप आहे. तोच 'भ' चक्राचा प्रारंभ आहे. तेच त्यांचे दत्तात्रय स्वरूप आहे. कलियुगात
त्यांचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ आहे. हा अश्विनी नक्षत्रांच्या सरळ रेषेत
१८० अंशावर असलेले चित्रा नक्षत्र त्यांचे जन्मनक्षत्र आहे. १८० अंश दूर असणारे
कोणतेही नक्षत्र किंवा कोणताही ग्रह शक्तकेंद्रित करण्याचे कार्य करतो. मनुष्य, त्याचे पूर्वजन्म कृत प्रारब्ध गणिताने योग्य अशा ग्रहसंपुटिने
जन्माला येतो. ग्रह मानवावर द्वेष भावना अथवा प्रेम भावना ठेवीत नाहीत. त्या
ग्रहातून निर्माण झालेल्या विविध किरणांनी, विविध स्पंदनाने त्या त्या काळी, त्या प्रदेशात त्या विशिष्ट जीवांना इष्टानिष्ट फल मिळतात. अनिष्ट
फळाच्या परिणामा पासून दूर जाण्यास आपणास त्या किरणांना आणि स्पंदनाना दूर करावे
लागते. हे आपण
१) मंत्र -तंत्राने
२) ध्यानाने आणि
३) प्रार्थनेने तसेच
४) योगशक्तीचे सहाय्याने साध्य करू
शकतो.
पूर्वजन्मकर्म अत्यंत प्रबळ असेल तर वरील विधान कांही करू शकत
नाही. अशा परिस्थितीत श्रीपाद प्रभूच आपली भाग्य रेषा बदलून टाकू शकतात. या
प्रमाणे आपली भाग्य रेखा बदलून लिहिण्यासाठी आपणाकडून दुसऱ्यासाठी कांही ना कांही
चांगले काम होणे आवश्यक आहे. सर्वसाधारण परिस्थितित हे साधणे कठीण आहे. सृष्टीच्या
कार्यकलापात किंवा कर्मदेवतेच्या कार्य कलापात श्रीपाद प्रभू अनावश्यक दखल देत
नाहीत. भक्तांची तीव्रता श्रीपाद प्रभूना हलवून सोडते व योग्य उपाय सांगण्यास
प्रेरित करते. श्रीपादांच्या हृदयातून उमडणारे प्रेम, करुणा यांच्या महा प्रभावामुळे कर्मदेवतेची शक्ति निस्तेज होऊन
जाते. कर्माचे रूप जड असते. श्रीपाद प्रभू हे चैतन्यस्वरूप आहेत. योग्य वेळी प्रगट
होऊन आपल्या चैतन्य शक्तीची समर्थता ते प्रदर्शित करतात हा त्यांचा अत्यंत सहज भाव
आहे.
मी (गुरुदत्त भट्ट) अज्ञानी दशेत ज्योतिष्य शास्त्रातील महापंडित
समजत होतो. मी कर्नाटक प्रदेशातून आलेला, त्यामुळे मला तेलुगु भाषा
अस्खलितपणे बोलता येत नसे. संस्कृत भाषा मात्र चांगली येत असे. माझ्या भाग्यानेच
मला पीठिकापुरमला जाण्याची संधि प्राप्त झाली. श्रीपाद श्रीवल्लभांबद्दल मी अनेक
गोष्टी कर्णोपकर्णी ऐकल्या होत्या. माझे कुलदैवत श्री दत्तात्रेय प्रभूच आहेत. मी
पादगया क्षेत्र असलेल्या पीठिकापुरम् मधील कुक्कुटेश्वर देवालयाच्या दर्शनार्थ आलो
होतो. भक्ति श्रध्दायुक्त अंत:करणाने देवतेचे दर्शन घेतले. मी ध्यानात बसलो असताना
माझी अंत:वाणी स्पष्टपणे म्हणाली ''अरे मुर्खा तुला मरून किती दिवस
झालेत? तू माझा भक्त असे सांगून माझी आरती करून पायावर डोके ठेवित आहेस.
पादगयेला येऊन माझ्या पायावर डोके ठेऊन नवस पूर्ण करणार आहेस? का माझ्या पायावर डोके आपटून माझे रक्त आटविणार आहेस? असे शब्द मला वारंवार ऐकू येऊ लागले. मी ज्योतिष पंडित असे गृहीत
धरून माझी जन्मपत्रिका बनविली होती. त्या पत्रिकेनुसार मी ज्या दिवशी ह्या शरीराचा
त्याग करणार त्या दिवशी पादगया क्षेत्री असलेल्या दत्तप्रभु सन्मुख असेन. मी
माझ्या नाडी स्पंदनाला पाहिले. नाडी चालत नव्हती. हृदयावर हात ठेऊन पाहिले ते
सुध्दा बंद होते. मी माझा चेहरा आरशात पाहिला. माझ्या चेहऱ्यावर जीवनकळा जाऊन
प्रेत कळा आली होती. मी हसत आरशात पाहिले तो माझे मुख अजूनच भयानक दिसू लागले. मला
गर्व करण्यासारखे काय उरले होते? विकृत अशा प्रेतकळेने मेलेला माणूस
पिशाच्च तत्वाने युक्त होऊन हसत असल्यासारखा मला वाटला. स्वयंभु दत्तात्रेयांच्या
देवळातील पुजारी,
त्यांचे सूक्ष्म शरीर मी पाहिले.
त्याचे सूक्ष्म विकार अत्यंत कलेने युक्त असे दिसले. माझ्यातील कोपऱ्यात दडून
बसलेला विवेक जागा झाला. श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन झाल्याशिवाय आपले दुर्भाग्य
संपणार नाही, असे वाटले. देवता आनंद स्वरूप असतात. ते आनंदाच्या उच्च स्थितित
असतात. माझी स्थिती फारच दु:ख दायक होती. माझा जीव अतिशय दु:खी होता. आत्मा
शरीराला सोडून गेल्यावर देहाच्या सर्व बाधा संपतात. माझा आत्मा अजून शरीर सोडून
गेला नव्हता, जिवंत असल्या प्रमाणे निर्बंध स्थितीत हृदयस्पंदनाना शरीरात भरून
श्री गुरुदेवांनी मला एक अनामिक अवस्था प्रदान केली होती. अत्यंत निकृष्ट आणि पापी
लोकांचे बोलणे ऐकून मी कसा फसलो होतो याची मला जाणीव झाली. पाषण रूपातील स्वयंभू
दत्तात्रेयांच्या मूर्तीने घंडीकोट यांच्या घरी जन्म घेतला होता. पाषाणाच्या
मूर्तीला नाडी स्पंदन, हृदय स्पंदन कोठे असते? श्रीपादांना नाडी स्पंदन आणि हृदय स्पंदन आहे ना? महालया अमावस्येच्या दिवशी पितृदेवतांचा परम पवित्र दिवस असतो.
त्या दिवशी कोणीतरी अवधूत येऊन भिक्षा स्विकारून जातो. तेच दत्तात्रय असतात असे
तेथील लोकांचे मत आहे. श्रीपाद महाप्रभूच मल्लादींच्या मेहुण्याच्या रूपात जन्मास
आले केवढे हे आश्चर्य! काय ही वंचना? असे निकृष्ट बोल ऐकून मी स्तब्धच
झालो. त्या निकृष्ट व्यक्तीचे बोलणे यथार्थ समजून मी रत्नतूल्य श्रीपाद प्रभूंना
अंतरलो. असा मला मनापासून पश्चाताप झाला.''
मी तत्काळ श्रीपाद प्रभूंच्या घरी धावतच गेलो. दहा वर्षाचे वय
असलेले श्रीपाद प्रभू अंगणात आले. ते गुरुदत्तभट्टाला पाहून म्हणाले ''ये रे ये, मूर्खा! जिवंत असल्याचे नाटक करतोस.
मृतवत् असलेल्या तुझ्या सारख्या मानवरूप पिशाच्चाला सद्गती माझ्या कृपेनेच प्राप्त
होऊ शकते. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यामुळे रौरवादी नरकाच्या यातना भोगीत असलेल्या
तुमच्या पितरांना सद्गती मिळावी म्हणून अवधूत वेषधारी होऊन महालया अमावस्येच्या
पवित्र दिनी भिक्षा मागण्यास आलेला मी कोण हे तू जाणतोस का ? ते दत्तात्रेय कोण ते माहित आहे का ? ते दत्तात्रेय
म्हणजे मीच आहे. त्यांचे नुसते नांव घेतले तरी राक्षस पिशाच्च गण थर थर कापू
लागतात. ते दत्तात्रेय मीच आहे. तुझे मी दगडी शिळेमध्ये रूपांतर करू शकतो, तुला उपाशी ठेवू शकतो आणि तुझे प्राण सुध्दा घेऊ शकतो. तू जिवंत
असल्या प्रमाणे दिसत असलास तरी मृतवत आहेस, तू जिवंत असल्याचे नाटक करू शकतोस.
मी दत्त आहे की नाही याचा विचार आपण नंतर करू. प्रथम तू तुझ्या विषयी सांग'' हे ऐकून मी (गुरुदेव भट्ट) गर्भगळित झालो आणि माझा थरकाप उडाला.
इतक्यात सुमती महाराणी अंगणात आल्या. त्या म्हणाल्या ''कृष्णा, कन्हैय्या हा प्रेतकळा असलेला अघोरी
माणूस कोण आहे?
तू आत ये तुझी दृष्ट काढते.'' यावर श्रीपाद म्हणाले ''माते हा अजून अघोरी झालेला नाही.
परंतु याचा पुढचा जन्म शवांना नेणाऱ्याचा येणार आहे. त्या जन्मापूर्वी तो माझ्या
दर्शनाला आला आहे. आपल्या घरी उरलेला भात याला खाण्यास दे. श्रीपाद प्रभूंच्या
मातेने शिल्लक ठेवलेला भात आणून दिला. श्रीपादांनी तो गुरुभट्टास दिला. आणि जेवून
लवकर निघून जाण्यास सांगितले. गुरुदेव भट्टाने तो भात घेऊन कुक्कुटेश्वराच्या
मंदिराच्या समोरील मोकळया जागेत बसून खाल्ला. तो खाताच त्याची दुरावस्था नाहिशी
झाली. तो पुन्हा श्रीपाद प्रभूंच्या दर्शनाला गेला. तेंव्हा श्रेष्ठी श्रीपादांना
घेऊन दुकानांत गेले होते. श्रीपाद प्रभू पैसे मोजून तिजोरीत ठेवित होते. श्रेष्ठी
स्वत: तांदुळ ज्वारी मोजून ग्राहकांना देत होते. तेंव्हा श्रीपादांनी श्रेष्ठींना
विचारले ''आजोबा आज दशमी आहे. बाबांना किती दक्षिणा देणार?'' तेंव्हा श्रेष्ठी म्हणाले ''आपणा दोघात काही भेद नाही. तूला जे
हवे असेल ते तू घेऊ शकतोस. तुला हवे असलेले तू घे आणि मला हवे असलेले तू मला दे.
ते दृष्य किती मनोहर होते त्याचे वर्णन करणे कठीण. श्रीपाद प्रभूंनी एक गुळाचा खडा
घेऊन तोंडात टाकला आणि एक गुळाचा खडा श्रेष्ठींना प्रसाद म्हणून दिला. श्रीपाद
प्रभू म्हणाले ''आज मला करायची असलेली गणेश पूजा झाली. गणेशांनी गुळाचा खडा तोंडात
टाकून नैवेद्य स्वीकारला. तुम्हास खोटे वाटत असल्यास माझे तोंड पहा'' असे म्हणून श्रीपादांनी आपले तोंड उघडून श्रेष्ठींना दाखविले. या
मुखात कोणते महारूप दिसले ते श्रेष्ठींनाच ठऊक. ते त्यांनी कोणालाच सांगितले नाही.
ते श्रीपादांना म्हणाले, सोनुल्या! श्रीपादा! गणेशाला
जेंव्हा भूक लागेल तेंव्हा आम्हास न विचारता हवा तेवढा गूळ नैवेद्यासाठी घेत जा.
तेवढयात अखंड सौभाग्यवती वेंकट सुब्बमंबा तेथे आल्या, त्यानी श्रीपाद प्रभूला अभ्यंग स्नानासाठी नेले. अरे, शंकर भट्टा! कुत्सित लोकांचे बोलणे ऐकून मी (गुरुदेव भट्ट)
अधोगतीला जाऊन अघोरी जन्माच्या दुर्भाग्यांत जाणार होतो परंतु श्रीपाद प्रभूंनी
त्यातून माझे रक्षण केले. मला नुसते सोडले असते, माझ्यावर
कृपादृष्टी झाली नसती तर माझे पतन झाले असते. सद्गुरुंना आपल्याबद्दल वाटणाऱ्या
निस्वार्थ प्रेमामुळे ते आपली पूर्वजन्मातील कर्मफलापासून पूर्ण सुटका करतात.
यासाठी ते आपला अमूल्य वेळ आणि शक्ति खर्ची घालतात. श्रीपाद प्रभुंची जन्म पत्रिका
सांध्रसिंधु वेदातून पाहता येते. श्रीपाद प्रभूंच्या घरी तेलुगु भाषेबरोबर संस्कृत
भाषा सुध्दा बोलली जात असे. हिमालयातील पवित्र भूमीवर जी भाषा बोलली जात असे त्या
भाषेत श्रीपाद प्रभू, अप्पळराज शर्मा, बापनाचार्युलु बोलत असत. संबल प्रांतात बोलली जाणारी भाषा संस्कृत
भाषेपेक्षा वेगळी होती. त्या भाषेचे माधुर्य सरलता वर्णनातीत होती. ही भाषा
पीठिकापुरम् मधील केवळ श्रीपाद प्रभू, बापनाचार्युलु अप्पळराजू शर्मा
यानांच बोलता येत असे. सत्यऋषीश्वर नावाचे एक विद्वान गृहस्थ बापनाचार्युलु बरोबर
असतांना श्रीपाद म्हणाले ''आजोबा, श्रीकृष्ण सत्य किंवा असत्य कांही बोलत नसत. ते केवळ कर्तव्य बोधक
होते.'' त्यावर बापनाचार्युलु म्हणाले, कन्हैय्या, नेहमी सत्यच बोलावे. औषधाला सुध्दा खोटे बोलू नये. हे ऐकून श्रीपाद
प्रभूंनी मंदहास्य केले. त्या दिवशी बापनाचार्युलुंच्या घरी वेंकट सुब्बया
श्रेष्ठी आले होते. त्यांची एक आंतरिक इच्छा होती की बापनाचार्युलुंनी त्यांच्या
घरी जेवण करून दक्षिणा स्विकारावी. हा दिवस परमपवित्र महालया पक्षातील एक दिवस
असावा ज्यांचेमुळे त्यांचे पितृदेव संतोष पावतील. ही इच्छा बापनाचार्युलु पूर्ण
करतील का नाही या बद्दल त्यांना शंका होती. त्यामुळे श्रेष्ठींनी श्रीपादांच्या
समोर नतमस्तक होऊन बापनाचार्युलुंच्या समोर आपली इच्छा प्रकट केली.
बापनाचार्युलुंनी महालय पक्षात श्रेष्ठींच्या घरी जाऊन जेवण करून दक्षिणा
स्विकारण्याची अनुमती दिली. या सम्मतीने श्रेष्ठीच्या आनंदाला पारावार नव्हता.
श्रीपाद
प्रभू बहु चमत्कारी होते
महालय पक्षातील जेवणाचे आमंत्रण स्विकारलेले बापनाचार्युलु आणि
आमंत्रण देणारे श्रेष्ठी या दोघांना या गोष्टींचा विसर पडला. महालया अमावास्येचा
मध्यान्ह समय आला. श्रेष्ठी बापनाचार्युलुच्या घरी आले. श्रीपाद मंद हास्य करून
म्हणाले ''आजोबा, वाग्दान करू नये. केल्यास त्या
प्रमाणे नक्की वागावे. वाग्दान करून ते विसरणे महापाप आहे. तुम्हा दोघांना मी
त्याची आठवण करून देतो. त्यावेळी श्रेष्ठी आणि बापनाचार्युलु दोघांनाही आपली चूक
लक्षात आली. जीवांना समज कशी द्यायची आणि विस्मृती कशी घालवायची या दोन्ही कला
श्रीपादांना उत्तम रितीने अवगत होत्या. ते सर्व बाबतीत समर्थ होते. त्या दोघांना
सावध करून ते म्हणाले ''तुम्हाला विस्मृती देण्याचा माझा एक
हेतू आहे. प्रत्येक मानवात मी, मी करणारे एक चैतन्यरूप आहे. जीव
आपल्या माता पित्याकडून नुसते शरीरच नाही तर 'मी' असे चैतन्यरूप
सुध्दा ग्रहण करतो. या 'मी' अशा चैतन्याला
विश्व प्रणालिकेत पार पाडण्यासाठी कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचे कर्म असतेच.
पित्याकडून मुलाला,
मुलाकडून त्याच्या मुलाला असे
परंपरागत बंधन प्रत्येकाला असतेच. गृहस्थाश्रम सोडून संन्यास आश्रम स्वीकारल्यावरच
या कर्मबंधनापासून सुटका होते. आज केलेले वाग्दान परिमित होऊन नाम स्वरूपात्मक
असलेल्या या जन्मानंतर तुमच्या दोघातच संपणार असे नाही. हे बृहदाकार स्वरूपात
असलेल्या 'मी'
च्या चैतन्यात बदलल्यामुळे कोणत्या
तरी एका देशात कोणत्यातरी एका काळात बापनाचार्युलु वंशाची एखादी व्यक्ति, श्रेष्ठी वंशातील कोणत्या तरी एका व्यक्तीच्या घरी महालय पक्षातील
भोजन करून दक्षिणा स्वीकार करेल. ते केंव्हा, कसे, कशा प्रकारे ते
मला विचारु नका कारण कर्मस्वरूप फारच संदिग्धमय असते. सूक्ष्ममयी असते. कांही
कांही कर्मात भौतिक काल, योगकाल असा वेगवेगळा असतो. भौतिक
कालरित्या महालय पक्षातील हे कर्म करूनच संपवावे लागते. योग्य काळ नसेल तर ते कर्म
लांबणीवर पडते.
यावर मी (शंकरभट्ट) म्हणालो ''अरे गुरुदत्त भट्टा! भौतिक काळ आणि
योग काळ म्हणजे काय?
ते मला विवरण करून सांग.'' श्री गुरुदेव भट्ट महोदय म्हणाले ''भौतिक काळ, भौतिक देश, मानसिक काळ मानसिक दशा तसेच योगकाळ
आणि योग देश यांचे सहा ते दहा वर्षापर्यंतचे वय असते. तो नेहमी सोळा वर्षाच्या
किशोर अवस्थेतील मुला सारखा निरंतर विद्याआश्रमात असतो. त्याचा भौतिक काल साठ
वर्षाचा निर्धारित केलेला आहे. तो शरीराशी संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ वीस
वर्षे निर्धारित केलेला आहे. वीस वर्षाच्या युवकाला साठ वर्षाचे वय असलेल्या
वृद्धाचे वजन असते. जवाबदाऱ्या असतील तर त्यांचा काळ वीस वर्षे असतो. तो शरिराशी
संबंधित आहे. त्याचा मानसिक काळ साठ वर्षे आहे. या प्रमाणे भौतिक काळ आणि मानसिक
काळ एकाच काळात मिळून असावा असा नियम नाही. तो वेगवेगळा असू शकतो.''
काशीमध्ये
अथवा पीठिकापूरममध्ये निवास केल्याने तापत्रयापासून सुटका.
काशीवासाचे
फल - पिठापुरम् निवासाचे फल
श्रीपाद प्रभू म्हणाले ''मी कालातीत आहे. ज्या भक्ताला
काशीमध्ये निवास करण्याची इच्छा आहे आणि आंतरिक तळमळ आहे त्याला काशी निवासाची
प्राप्ति होते. भौतिक दृष्टया तो कोणत्याहि प्रदेशात असला तरी मानसिक दृष्टया
त्याचा निवास काशीतच असतो. भौतिक दृष्टया काशीत राहून गोहत्या करणाऱ्यास काशी
निवासाचे फळ मिळत नाही. ज्या प्रमाणे गंगाजलातून माशासाठी निरीक्षण करणाऱ्या
बगळयास गंगास्नानाचा लाभ होत नाही. एखादा साधक भौतिक रूपाने पीठिकापुरमला राहात
असेल आणि श्रीपाद प्रभूंचे दर्शन सुध्दा घेत असेल तरी जर त्याचा मानसिक काल आणि
देश पीठिकापुरमला नसेल तर तो श्रीपाद प्रभूंचा भक्त होणार नाही. योग काल आणि योग
देश अध्यात्मिक शक्ति संपन्न असलेल्या व्यक्तिलाच अवगत असतो. श्रीपाद प्रभूंचा
अनुग्रह कोणाला आणि केंव्हा मिळेल, कोणत्या देशात मिळेल हे न कळणारे
गूढ रहस्य आहे. मानवाला केवळ कर्म करण्याचाच अधिकार आहे.''
देह
हे एक क्षेत्र आहे त्यात जर मन नसेल तर त्याला क्षेत्र वासाचे फल मिळणार नाही
सत्कर्म केल्याने सुख आणि दुष्कर्म केल्याने दु:ख प्राप्त होणे हे
अनिवार्य आहे. पूर्वजन्माचे बंधन आपला पाठलाग करीत असते. सद्गुरुंच्या कृपेमुळे
आपण त्या पासून मुक्त होतो. काल चांगला नसेल तर आपण कोणत्याही देशात असलो तरी त्या
कर्माचे फल चुकवू शकत नाही. हा अत्यंत अनाकलनीय विषय आहे. पीठिकापुरममध्ये नरसिंह
वर्मांच्या घरी एक सेवक होता. त्याचे नांव शिवय्या असे होते. एके दिवशी श्रीपाद
प्रभूंना त्याने पाहिले. तत्काळ त्याच्या मनोवृत्तीत बदल झाला. त्याने निद्रा आहार सोडले. आणि असंबध्द बोलू लागला. ''मी सृष्टी स्थिति आणि लय यासाठी कारणीभूत आहे. मीच सर्व सृष्टीचे
आदिमूळ आहे. ही सृष्टी माझ्या पासूनच उत्पन्न झाली आहे. माझ्यामुळेच वाढणार असून
माझ्यातच लय पावणार आहे.'' नरसिंह वर्माना शिवय्याची अत्यंत
दया आली. त्यांनी श्रीपादांना शिवय्याचे रक्षण करण्याची विनंती केली. श्रीपाद
प्रभु शिवय्यास स्मशानात घेऊन गेले. त्यांच्या बरोबर नरसिंह वर्मा सुध्दा होते.
औदुंबराच्या झाडाची वाळलेली फांदी स्मशानात ठेऊन शिवय्याच्या हातून त्याचे दहन
करविले. या मुळे शिवय्याची त्या विचित्र मनोवृत्तीतून सुटका झाली. नरसिंह वर्माना
हे सारे अत्यंत आश्चर्यकारक वाटले. श्रीपाद प्रभू म्हणाले ''आजोबा, यात आश्चर्य करण्यासारखे काही नाही.
वायसपूर गावात एक पंडित माझ्यावर अत्याचार करीत होता. तो वारंवार असे म्हणे की
वेदस्वरूप असलेला परमेश्वर कोठे आणि हा लहान वयाचा श्रीपाद कोठे ? तो सृष्टी, स्थिती, लय याचा कारक आहे म्हणे, तो आदिमूल आहे म्हणे, हे सारे खोटे आहे. थोडयाच दिवसात तो पंडित मरण पावला आणि आपल्या
कृत्यामुळे ब्रह्मराक्षस झाला. एका जन्मी हा शिवय्या त्या पंडिताचा अल्पऋणी होता.
मी योगकाल कल्पून स्मशानात योगदेश निर्माण करून योग कर्माच्या योगाने वाळलेल्या
काडीचे दहन करून त्या ब्रह्मराक्षस तत्वातून पंडिताची सुटका केली. आपल्या
शिवय्याची त्या ब्रह्मराक्षसाच्या पंज्यातून सुटका केली.''
अरे शंकरभट्टा! पीठिकापुरम क्षेत्री अवतरलेले हे महातेजस्वी आणि
धर्मज्योती श्रीपाद प्रभू कुरुगड्डीस येऊन त्यांनी या क्षेत्रास पवित्र केले.
श्रीपाद प्रभूंच्या महा संकल्पाने ग्रहांचे फलित ठरविले जाते. कोणत्याही
प्रकारच्या ज्योतिष्य फलाने निर्धारीत केलेले भौतिक काळ आणि भौतिक नियम नसतात. ते
योग काल पाहून योगदेश पाहून यांचा निर्णय होतो.
श्रीपादांनी
अनुग्रहित केलेले प्रारब्ध कर्म - मरण चुकवू शकते
श्रीपादांनी कल्पना केलेल्या ज्योतिष्य शास्त्रानुसार एक हजार
वर्षानंतर घडणाऱ्या घटना ते आताच घडवू शकतात म्हणून योग काल तेच ठरवितात. दूर
घडणारी घटना सुध्दा ते आपल्या जवळ घडवू शकतात म्हणून योगदशेचा निर्णय सुध्दा ते
करू शकतात. संघटना सर्व देश कालात ते घडवू शकतात. श्रीपादांना देशकाल त्यांच्या इच्छे
प्रमाणे बदलता येतो. एकदा श्रेष्ठींच्या देवांना नारळ फोडताना स्वत: श्रीपादानी तो
नारळ फोडला. त्या नारळाचे त्यांनी तुकडे, तुकडे केले. श्रीपाद म्हणाले ''आजोबा, आज तुमचा मरण योग होता परंतु मी
नारळाचे तुकडे करून तो टाळला.'' सायंसंध्येची वेळ झाली. श्रीपादांकडून
आज्ञा घेऊन कुरुगड्डी सोडून आम्ही कृष्णकथवल्ली ओढयाकडे मार्गस्थ झालो.
॥ श्रीपाद श्रीवल्लभांचा जयजयकार असो
श्रीपादश्रीवल्लभांचा
सत्संग
श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत
असत. श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत जात. त्यांची पाऊले ज्या ज्या
ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे. त्या पद्मावर
श्रीपादांच्या पाऊलांचे चिन्ह उमटत असे. ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित
बुध्दिला न उलगडणारे एक कोडेच होते. एवढेच नव्हे तर पाण्यावरून चालत जाणे हा
सुध्दा एक अद्भूत विषय होता. थोडे दिवस हे सर्व पहाणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे
परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादाची ती साधारण लीला वाटू लागली. श्रीपाद प्रभू
कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत. सायंकाळ पर्यंत
सत्संग चालू असे,
नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून
चालत ती पार करून पैलतीरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रध्दाभावाने त्यांचा जयजयकार
करीत. रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहात. पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी
यांच्या मध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे. प्रत्येक शुक्रवारी ते विवाहेच्छुक
कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशिर्वाद देत. महिलांना हळकुंड देत. श्रीपाद प्रभू
स्वत:पेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना ''अम्मा सुमती'' अथवा ''अम्मा अनसूया तल्ली'' असे संबोधित त्यांच्या पेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना ''अम्मा वासवी'' किंवा ''अम्मा राधा,'' ''अम्मा सुरेखा'' अशा नावाने बोलवित. त्यांच्या पेक्षा वयाने मोठे असलेल्या
पुरुषांना ते ''अय्या'' किंवा ''नायना'' असे संबोधीत. त्यांच्या पेक्षा लहान
असलेल्या मुलांना ''अरे अब्बी'' किंवा ''बंगारू'' या नावाने बोलावित. त्यांच्या
आजोबांच्या वयाचे असलेल्या वृध्दांना ''ताता'' असे बोलावित.
वृद्ध स्त्रियांना ''अम्ममा'' असे संबोधीत.
श्रीपादांचे
नित्य कार्यक्रम आणि दरबार (सत्संग)
गुरुवार आणि शुक्रवारी होणारा सत्संग, श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरुगड्डीस होइ तर कधी पंचदेव
पहाडावर. रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल
चर्चा करीत. त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेम कुशल विचारून त्यांच्या
अडचणी, प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवित आणि अभयवचन देत. सोमवारच्या
सत्संगात पुराणातील कथा सांगत. त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करीत.
मंगळवारचा सत्संग उपनिषदाचा बोध करण्यासाठी असे. यानंतर भक्तांच्या वैयक्तिक
समस्यांची चर्चा होऊन त्यावर उपाय योजना सांगत. बुधवारी वेद आणि वेदांचा अर्थ
विवरण करून सांगण्यात येत असे. गुरुवारी गुरुतत्त्वाबद्दल विवेचन असे. यानंतर
भक्तांच्या आधि-व्याधि श्रीप्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्याचे निराकरण
करण्याचा उपाय सांगत. या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वाना पोटभर सुग्रास भोजन
असे. या जेवणाचे वैशिष्टय असे की श्रीपाद प्रभू पंगतीत स्वत: कांही पदार्थ वाढीत
असत. कांही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत. त्यांच्या कडे अन्नधान्याचा
किंवा धनाचा कधीच अभाव नसे. शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत.
आणि सर्वाना विधिपूर्वक हळकुंडाचा प्रसाद देत. शनिवारी शिवाराधना महात्म्याबद्दल
बोध करीत. श्रीपाद प्रभूंचा सत्संग ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत. श्रीप्रभूंचे
भक्त भाजीपाला,
ज्वारी, रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेले धान्य आणीत. दररोज भक्तांना
अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाई, त्या दिवशी सर्व पदार्था बरोबर एक पक्वान्न केले जाई, ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात असे. श्रीपादांचे हृदय
लोण्यासारखे अत्यंत मृदु होते. त्यांना भक्तांची दु:खे पाहवली जात नसत. त्यांच्या
सत्संगात आलेला दु:खी श्रोता जातांना अत्यंत आनंदाने घरी जात असे. श्री
दत्तात्रेयाच्या दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तत्काळ
अनुग्रह होत असे. अशी ही श्रीप्रभूंची माया कोटी मातेच्या प्रेमा पेक्षा अधिक असे.
रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे. परंतु माझ्या बरोबर
आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूनी राहण्याची सम्मति दिली. मला सुध्दा
रात्री कुरुगड्डीस रहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले. दुसऱ्या दिवशी श्रीपाद
प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्याचा आदेश दिला व अंतकाळापर्यंत तेथेच
राहाण्यास सांगितले. स्वयंपाकाची भांडी घासणे, स्वयंपाक करणे, येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती.
दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे. जे भक्त घरी जेवण करून
आलेले असत त्यांना सुध्दा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे. ज्या वेळी शिजविलेले
अन्न कमी असून जास्त लोक जेवणास आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या
कमंडलूतील जल भोजन पदार्थावर सिंचन करीत. त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व
भक्तांच्या भोजनानंतर ही शिल्लक राहात. या प्रमाणे श्रीपादांनी अनेक लीला केल्या.
रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा
करीत. सकाळ होताच ते महाप्रभूंचा आशिर्वाद घेऊन स्वस्थानी जात. कांही वेळा
हिमालयातून कांही योगी येत ते सुध्दा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत. त्यांचे देह
अत्यंत कांतिमान आणि दैदिप्यमान असत. या योग्यांना श्रीपाद प्रभु स्वत: जेवण
वाढीत. श्रीपादांचे जेवण म्हणजे मूठभरच असे, ते वऱ्याचे तांदुळ असोत किंवा
ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो. त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना
स्वत:चे पोट भरल्याची संतृप्ति प्राप्त होत असे. रविदास नावाचा एक रजक होता.
त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते. परंतु
श्रीपादांच्या दर्शनानंतर सुध्दा वाईट प्रवृत्ति त्याला त्रास देत होत्या.
त्यांच्या निवारणासाठी श्रीपादांच्या चरणांचाच आश्रय घेतला. श्रीपाद प्रभू सांगत
असत की ''पितरांचे विधियुक्त श्राध्द केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ति
मिळते. अष्टदशा वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्म कर्मा प्रमाणे फळ भोगावे लागते.
त्यात पक्षपाती दृष्टी नसते. आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही. माझ्या
पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल.'' कित्येक जन्माच्या पुण्य फळानेच श्रीपादाचे दर्शन लाभते. अशा
आलेल्या संधीचा पुरेपुर फायदा करून घ्यावयास हवा. या संधीचा उपयोग न केल्यास
कित्येक जन्मापर्यंत सद्गुरुंचे दर्शन होणे कठीण आहे. या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये
एक लाख पंचविस हजार महासिध्द पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला
त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्याच्या द्वारेच या सृष्टीला
सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो. श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिति, स्थिति आणि लय होत असते. भक्तगण जेंव्हा गुरुंना श्रध्दाभावाने
नमस्कार करतात तेंव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वत:च्या गुरुंना पोहोचवितात. या
प्रमाणे आपण आपल्या गुरुंना केलेला नमस्कार अनेक गुरुंना पोहोचतो. देवांना जरी
आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रोधापासून आपले रक्षण करतात. प्रत्येक
शिष्याला गुरुंचा आशिर्वाद लाभतो. गुरुंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची
प्राप्ति होते. श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते.
हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्मांचे आचरण कुरुगड्डीचा विशेष
महिमा नित्यक्षेत्रा सारखा आहे. येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे. या
क्षेत्रात अनेक देवता, महर्षी, महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात. येथे त्यांचे स्थान
ठरलेले असते. हृदयामध्ये देवाचे नांव भरून, सदाचरणाने राहून विहित कर्म करीत
रहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत. प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन
करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्य कर्म करून त्याचा
कर्ताभाव स्वत:कडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते. श्रीपाद
प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवन नौका या भवसागरातून सुलभतेने
पैलतीरी जाईल.
श्रीपादश्रीवल्लभ
आणि दत्तानंद स्वामी
श्री दत्तानंद स्वामी एक महान दत्तभक्त होते. त्यांना बालपणी
स्पष्ट बोलता येत नसे. शब्द तोतरे येत त्यामुळे मित्र मंडळी त्याची थट्टा करीत.
त्याना एक अनामिक आजार झाला होता. पाच वर्षापासून तो वाढू लागला. एक वर्ष
लोटल्यावर दहा वर्षे उलटल्याप्रमाणे शरीरात बदल होत होता. ज्यावेळी ते दहा वर्षाचे
झाले त्यावेळी त्यांच्या शरीरात पन्नास वर्षे झाल्यासारखी लक्षणे दिसू लागली होती.
त्यावेळी बापन्नाचार्युलू पिठीकापुरात यज्ञ करीत होते. त्या यज्ञासाठी श्री
दत्तानंद स्वामींच्या वडिलांनी त्याना पिठीकापुरात नेले. यावेळी श्रीपाद प्रभूंचे
वय सहा वर्षाचे होते. यज्ञासाठी लागणारे तूप एका वयस्क ब्राम्हणाच्या स्वाधीन केले
होते. तुपाचा एकत्रीतीअंश (१/३) भाग घरी लपवून ठेऊन दोन-त्रितीअंश (२/३) भाग तो
ब्राम्हण प्रतिदिन यज्ञासाठी आणीत असे. यामुळे थोड्या वेळातच तूप संपत आले.
त्यावेळी तूप तयार करणे कठीण काम होते. हा चिंतेचाच विषय होता. यावेळी
बापान्नाचार्युलुनी श्रीपादप्रभूंकडे हेतू पुरस्सर पहिले. श्रीपाद म्हणाले, “कांही चोर माझे धन अपहरण करीत आहेत. परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल
होऊ देणार नाही. योग्य वेळीच त्याना शिक्षा देईन. त्याच्या घरी पत्नी बरोबर
शनीदेवाने रहावे अशी आज्ञा करतो आहे.” एवढे बोलून श्रीपादानी त्या वृद्ध
ब्राम्हणास बोलावून एका ताडपत्रीवर असे लिहून दिले “आई गंगामते, यज्ञाच्या निर्वाहणासाठी लागणारे धृत द्यावे. तुझी बाकी माझे आजोबा
वेंकटपय्या देऊन टाकतील. ही श्रीपादांची आज्ञा आहे.”
हे पत्र त्यांनी श्रेष्ठीना दाखविले. त्यांनी ते मान्य केले. त्या
वृद्ध ब्राम्हणा समवेत चार अन्य ब्राम्हण पादगया तीर्थावर गेले. ते पत्र
तीर्थराजास समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले आणि
वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञ स्थळी आणले. जल आणीत असतानाच सर्वांच्या समोरच त्या
जलाचे तूप झाले. त्या धृताचा आहुतिने यज्ञाची सांगता झाली. सर्वजण आनंदित झाले.
वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून गया तीर्थास समर्पित केले. धृत ओतत
असतानाच त्याचे पाण्यात रुपांतर झाले होते. दत्तानंदाच्या पित्याने आपल्या
पुत्राच्या व्याधीबद्दल श्रीपाद प्रभुना सांगितले. ते म्हणाले “थोडा वेळ थांबा, रोगाचे निवारण होईल. तोतरेपणा निघून
जाईल. एक घर जळणार आहे.”
प्रभूंची वचने अनाकलनीय होती. त्याच वेळी तो वृद्ध ब्राम्हण तेथे
आला. तूप चोरल्यामुळे कांही हानी झाली काय ते पाहण्यासाठी तो आला होता. श्रीपाद
प्रभू त्यास म्हणाले, “आजोबा, परम पवित्र अशा यज्ञासाठी जमविलेले तूप एका धुर्ताने चोरून नेले.
अग्नीदेवाला भूक आवरली नाही. धर्मानुसार त्यांना मिळावयाला हवे असलेले तूप न
मिळाल्यामुळे ते घर जाळून आपली भूक भागवीत आहेत.”
श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यावर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा
पडला. श्रीपाद पुढे म्हणाले, “तुझे घर भस्मसात झाले आहे. त्याचे
थोडे भस्म घेऊन ये.”
प्रभूंच्या सांगण्या प्रमाणे तो
ब्राम्हण आपल्या भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला. ते भस्म पाण्यात टाकून ते
पाणी श्रीपाद प्रभुनी दत्तानंदास पिण्यास दिले. अशाप्रकारे भस्ममिश्रित पाणी तीन
दिवस पिल्यानंतर दत्तानंदाचा तोतरेपणा पूर्णपणे नष्ट झाला आणि ते स्वस्थ झाले.
श्रीपाद प्रभुनी आपला दिव्य हात दत्तानंदाच्या शिरावर ठेउन शक्तिपात केला.
ज्याच्या योगाने ते ज्ञानसंपन्न झाले. त्यानंतर प्रभू म्हणाले “आज पासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील. गृहस्थाश्रमाचा
स्वीकार करून लोकांना तारशील, धर्मबोध करशील. तू आणि हा ब्राम्हण
मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता. व्यापारात वैषम्य आल्याकारणाने एकमेकांचा
नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होता. एके दिवशी तू या वृद्ध ब्राम्हणास घरी
बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस. त्या खिरीत विष कालविलेले होते. ती खीर खाताच तो
ब्राम्हण अल्पावधीत मरण पावला. तुला न कळू देता त्या ब्राम्हणाने तुझे घर, अन्य लोकांकरवी, जाळून टाकले होते. त्यात तुझी पत्नी
जळून मेली. तू बाहेरून घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्याने हृदय बंद
पडून तू मरण पावलास. पूर्वजन्मात विषप्रयोग केल्यामुळे तुला या जन्मी या विचित्र
व्याधीस बळी पडावे लागले. तुझे घर या ब्राम्हणाने पूर्वजन्मी जाळले असल्याने
त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले. या लीलेने मी तुम्हा दोघाना तुमच्या
कर्मबंधनातून मुक्त केले आहे.”
श्रीपादश्रीवल्लभपद
|| श्रीपाद श्रीवल्लभ जय नरसिंहसरस्वति यतिवर दत्ता ||ध्रु||
|| कृष्णावेणीतीरविहारा भवसंहारा
शिक्षितमत्ता ||
|| सत्ता हे तव हे भवदवदव चित्तातीता
हो अनियत्ता ||१||
|| सत्तारक तूं स्थिरचर हेतू हरिं मम
मंतु निजपदीं चित्ता ||
|| रमवी रमणा भवभयहरणा निरूपमकरुणा
मुनिजनवित्ता ||२||
|| वित्तातें श्रुतिमस्तकवित्ता आहे
जरि तरि वळवुनि चित्ता ||
|| माझ्या आतां मजवरि दत्ता करीं
करुणेक्षा मृदुतरचित्ता ||३||*
श्रीपादश्रीवल्लभ
व रक्षाबंधन
श्री
हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची श्रीपाद प्रभूंची अनुज्ञा
(संदर्भ: श्रीपाद
श्रीवल्लभ चारितामृत)
श्रीपाद प्रभुनी काशी नगरात अनेक महापुरूषांना आशीर्वाद दिले.
त्यांना हव्या असलेल्या योगसिद्धी प्राप्त करून दिल्या. ते ऋषीसमुदायास उद्देशून
म्हणाले “मी नृसिंह सरस्वती नांवाने अजून एक अवतार घेणार आहे.मी पिठीकापुरी
अदृश्य होऊन काशी क्षेत्री येण्याचे कारण हे महापुण्य क्षेत्र आहे. सिद्ध
संकल्पांची येथे पूर्तता होते. मी दररोज गंगेत स्नान करण्यासाठी योगमार्गाने येत
असतो. मी नृसिंह सरस्वती अवतारात येथेच संन्यास दीक्षा स्वीकारणार आहे. येत्या
शतकात क्रिया योगाचे ज्ञान इच्छिणाऱ्या गृहस्थाश्रमी लोकाना बोध करण्यासाठी
श्यामचरण नांवाच्या एका साधकाला येथे काशीत जन्म घेण्याचा आदेश देत आहे.” या वक्तव्या नंतर श्रीपाद प्रभू ऋषीसंघाबरोबर योगमार्गाचे अनुसरण
करीत बदरीका वनात येऊन पोचले. तेथे त्यांनी नर-नारायण गुहेत अनेक शिष्यांना
क्रीयायोगाची दीक्षा दिली. तेथून ते बारा कोस अंतरावर असलेल्या उर्वशी कुंडाजवळ
आले. ऋषीगंगेत त्यांनी स्नान केले. येथे पाच हजार वर्षांपासून तपस्या करीत
असलेल्या सर्वेश्वारानंद नांवाच्या महायोग्यास त्यांनी आशीर्वाद दिला. येथून ते नेपाळ
देशात गेले. तेथे एका पर्वतावर श्रीरामनामाच्या ध्यानात मग्न असलेल्या हनुमंतास, श्रीराम, सीता, लक्ष्मण. भरत आणि
शत्रुघ्न या सर्वांचे एकत्रित पणे दर्शनश्रीपाद प्रभूंनी घडविले. ते हनुमंतास
म्हणाले “अरे हनुमंता तू रामनामाचा किती कोटी जप केलास याचा अंदाज लागत
नाही. इतक्या थोड्या काळात तू रामनामाचा एवढा महान जप केलास की चित्रगुप्ताला
सुद्धा त्याचा हिशोब ठेवणे अशक्य झाले.” श्रीपाद प्रभू हनुमंतास पुढे
म्हणाले “तू कलीयुगात अवतरित हो. जितेंद्रिय होऊन सर्वाना वंदनीय होशील.” हनुमंताने विचारले “प्रभू मी कोणत्या स्वरूपात अवतार
घ्यावा ते मला सांगा.”
श्रीपाद प्रभू मंद हास्य करून म्हणाले “तू शिवांश रूपाचा रामभक्त हो. अरबी भाषेत अल म्हणजे शक्ती आणि अहा
म्हणजे ती शक्ती धारण करणारा. म्हणून अल्लाह म्हणजे शिवशक्ती स्वरूप असा त्याचा
अर्थ आहे. इतकी वर्षे सीतापती श्रीराम म्हणून माझी सेवा केलीस आता यवन जातीच्या
लोकांनी अंगीकार करण्या योग्य असा शिवशक्ती स्वरूप अल्लाह नावाने माझी आराधना कर.” हनुमंत श्रीपाद प्रभुना म्हणाला “प्रभो मी तुम्हाला सोडून कोणत्याही
परिस्थितीत राहू शकत नाही.तुमचे आणि माझे गोत्र एकच आहे त्यामुळे मी तुमचा पुत्रच
आहे. होय ना?” श्रीपादांनी मोठ्या प्रेमाने हनुमंतास आलिंगन दिले आणि म्हणाले “हनुमंता तू देहबुद्धी सोडून दे. तू माझाच अंश आहेस.” हनुमंत म्हणाला “प्रभो मी याचा अंगीकार करतो की मी
तुमचाच अंश आहे. मी तुमचे कार्य करून नंतर मूळ तत्वात विलीन होऊन जाईन तेंव्हा अंश
अवतारही पूर्णपणे नष्ट होईल. अंश अवतारात मूळ तत्व निरंतर माझ्या सोबतच राहील. ती
तत्वे ज्यावेळी फोफावतील त्यावेळी तुमच्या शक्ती,संपदा मूळ तत्वांनी मला धरून ठेवा.” हनुमंताचे हे वक्तव्य ऐकल्यावर प्रभू म्हणाले “अरे हनुमंता तू फार बुद्धिवान आहेस. ज्या माझ्या शक्ती आहेत त्या
सर्व तुझ्याच आहेत. मी नृसिंह अवतारचे अंती श्रीशैल्याजवळील कदलीवनात तीनशे
वर्षांपर्यंत योग समाधीमध्ये राहीन. त्यानंतर प्रज्ञापूर (सध्याचे अक्कलकोट) येथे
स्वामी समर्थ या नावाने प्रसिद्ध होईन. हा अवतार समाप्त करतेवेळी साई रुपाने
तुझ्यात अवतरित होईन. त्यावेळी तू एका समर्थ सद्गुरूंच्या अवतारात प्रसिद्धी
पावशील. यानंतर हनुमंत म्हणाला “प्रभू मी तुमचा सेवक “अल्ला मलिक है.” असे म्हणत संचार करीन मी तुमच्या
स्वरुपात आणि तुम्ही माझ्या स्वरुपात बदलल्यास आपणातील अव्दैत सिद्ध होईल. यासाठी
आपण मला दत्त प्रभूंच्या सायुज्यतेचा प्रसाद द्या” श्रीपाद
प्रभूंच्या आदेशानुसार कालपुरुष त्यांच्या समोर हात जोडून उभा राहिला. श्रीपाद
प्रभू म्हणाले “हे कालपुरुषा हा हनुमंत कालातीत आहे. मी त्याला माझी सायुज्यता
प्रसाद रुपाने दिली आहे. त्याला नाथ असे संबोधन देत आहे. आता पासुन तो साईनाथ या
नांवाने संबोधन केला जाईल. आज दत्तजयंती साजरी करू या. हनुमन्तातील चैतन्य दत्त
स्वरुपात प्रकट झाले. हे पाहून ऋषी समुदाय श्रीपाद प्रभूंकडे आश्चर्याने पाहू
लागला. त्याच वेळी हनुमंताच्या शरीरातील जिवाणूंचे विघटन झाले आणि त्यातून अनुसया
माता प्रकट झाली. ती श्रीपाद प्रभुना म्हणाली “बाळा कृष्णा तू किती उत्तम मुलगा
आहेस. तुला जन्म दिला त्यावेळी सर्व साधारण मातेला होणाऱ्या प्रसव वेदना मला
झाल्या नाहीत. मातेला अशा वेदनेमध्ये सुद्धा एक प्रकारचे सुख असते. त्यात
माधुर्याची अनुभूती येत असते. परंतु तुझ्या जन्माच्या वेळी मी या सुखापासून वंचित
राहिले. तू माझ्या पोटी पुन्हा जन्म घेणार नाहीस ना? ही तुझी वैष्णवी
माया मला समजत नाही.” यावर श्रीपाद म्हणाले “माते, पुत्राने मातेची धर्मबद्ध इच्छा
पूर्ण करावयाची असते. तुझ्या गर्भातून प्रकट झालेला हा हनुमान आहे.त्याला माझी सायुज्य
स्थिती प्राप्त करून दिली आहे. एका प्रकारे सांगावयाचे म्हणजे माझ्या मायेने मी
तुझ्या पोटी पुन्हा जन्म घेत आहे. थोड्याच वेळात तुला तीव्र प्रसव वेदना प्रारंभ
होतील. यानंतर अल्पकाळातच अनसूया मातेने तीन शिरे असलेल्या दत्तमुर्तीस जन्म दिला.
थोड्याच वेळात ती मूर्ती अंतर्धान पावून तिच्या मांडीवर एक शिशु प्रकट झाला. त्या
नवजात शिशुला अनसूया मातेने स्तनपान करविले. ही घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात
हनुमंताचे स्वरूप दिसले. त्यांच्या समोर श्रीरामचंद्र प्रभू सीता मातेसह उभे होते.
त्यावेळी हनुमान आपल्या आराध्य दैवताचे दर्शन प्राप्त करून अत्यंत आनंदित झाला आणि
त्याने दोघाना साष्टांग नमस्कार केला. तो सीता मातेस म्हणाला “माते| तू मला अत्यंत प्रेमाने व
वात्सल्यभावाने एक माणिक मोत्याचा हार दिला होतास त्या हारातील माणिक मोत्यात
श्रीराम शोधण्यासाठी मी दगडाने ते माणिक मोती फोडले. परंतु त्यांत श्रीराम दिसले
नाहीत म्हणून तो हार मी फेकून दिला. या महान अपराधाची मला क्षमा कर.” यावर श्रीपाद प्रभू म्हणाले “देवाच्या सानिध्या शिवाय कोणतेही
कार्य पूर्णतेस जात नाही. तो माणीकांचा हार मी व्यवस्थित ठेवला आहे. तो हार
दत्तस्वरूप आहे यात शंकाच नाही. माझ्यात असलेल्या आत्मज्योतीने मी त्यात प्राण
ओतले आहेत. तो माणीकांचा हार गुरु स्वरूपाच्या दिव्य तेजाने तळपत आहे. ते
गुरुस्वरूप माणिकप्रभूंच्या स्वरूपात विश्वविख्यात होईल.” एवढे बोलून श्रीपाद प्रभुनी आपल्या वाणीस विराम दिला.
'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' एक अद्वितीय मुद्रामंत्र स्वरूपिणी
'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' हा दिव्यं मंत्र तर आहेच पण श्रीगुरु श्रीपादराज याच्या चरणी शरण
जाण्याची अनुभूती ही आहेच. परम पूज्य श्रीगुरुभक्त शंकर भट
यांच्या श्रीगुरूंचे चरित्रआख्यान मधूनच जनमानसात या दिव्यं मंत्राची ओळख झाली. 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' हा दिव्यं मंत्र फक्त अडचणीतून किंवा संकट काळातून तारून नेतो हा
विश्वास असला तरी हा परम मंत्र आपल्या जीवनाचा आधार आहे. मृत्यूलोकामधल्या मनुष्य
प्राण्यामध्ये याचे स्मरण होत असले तरी सकल सृष्टीमधील प्रत्येक भूतांमध्ये (मनुष्य, प्राणी, सर्व जीव, पंचभूते) याचे स्पंदनरुपी स्मरण होत असलेच पाहिजे.
कलियुगातले तारणहार व सद्विवेकबुद्धीदायक असे श्रीदत्तात्रेय
श्रीपादवल्लभ आज गुप्तरुपाने आपले नियोजित कार्य सकल सद्गुरुंच्या योगे आपल्या
परमात्मस्वरूप गुरुतत्वामध्ये करीत आहेत. श्रीगुरुंचे सर्वश्रुत असे ओम द्राम दत्तात्रेयाय, दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ
दिगंबरा, श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये तीन मंत्र आहेत. प्रत्येक मंत्राचे
कृपासामर्थ्य वेगळे आहे व आपल्या भक्तिअवस्थेमधल्या रूपाचे दर्शन या मंत्र स्मरणा
मधून होत असते.
दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ
दिगंबरा हा श्रीगुरुंचा जयघोष आहे. श्रीगुरुंचे गुणगान करणारे अक्षरब्रह्म
आहे. श्रीगुरुंची अनुभूती मिळाल्यावर आपल्या वाणीमधून उस्फुर्तपणे होणार हा नाद
आहे, श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद स्वामीमहाराज यांच्या
दिव्यं अशा श्रीदत्तगुरूंच्या कर्मसाधनेतूनच याची अनुभूती भक्तजनांसाठी झाली आहे.
या मंत्राचे ही कृपासामर्थ्य विलक्षण आहे कारण श्रीमद स्वामी महाराजांच्या
दत्तसाधनेचा योग आपल्या भक्तिभावनेमध्ये मिसळून याचीही अनुभूती ही लवकर येऊ शकते.
आजचे तिन्ही श्रीदत्तावतार श्रीगुरु श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नरसिंहसरस्वती स्वामी महाराज आणि श्री स्वामी समर्थ यांच्या
सर्वांचा आवडीचा नाद हा "दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा" आहे,
ओम द्राम दत्तात्रेयाय हा
श्रीगुरुंचा बीजमंत्र आहे. जसे चांगल्या फळासाठी बीज उत्तम असावे लागते तसे आपल्या
देहामधून षड्रिपूंचा -ऱ्हास झाल्यावरच या मंत्राची दिव्यं अनुभूती येईल.
श्रीपादराजं शरणं प्रपद्ये या मंत्रांचे कृपासामर्थ्य आपल्या या जन्मामधल्या
देहापुरते मर्यादित तर नाहीच नाही. प्रत्येक आत्मास श्रीगुरूंच्या चैतन्याचा नुसता
स्पर्श ही या मंत्राने येईल. मग मनुष्यदेहातील गुप्तरूपाने बसलेली कुंडलिनी शक्ती
जी चैतन्यशक्ती आहे तिची जाणीव होईल. तिचा विकास हा श्रीगुरुंच्याच कृपाशक्तीमधून
होत राहील.
एका रविवारी सकाळी श्रीगुरु श्रीपादराजानी "श्रीपादराजं शरणं
प्रपद्ये" या मंत्राचे मुद्रारूप कसे आहे याचा बोध दिला. १५-२० मिनिटात हा
बोध अक्षरप्रमाणामध्ये उतरून झाला. असे हे ३३ ओवीचे मुद्रामंत्रस्वरूपिणी रचले
आहे. या मंत्रातील अक्षरब्रह्म ही मुद्राप्रमाणेच उमटले पाहिजे हा आग्रह नाही. ही
सर्व श्रीगुरुंची मोहमाया आहे ही समजून घेतले तर जन्म कृतार्थ होईल. हा मंत्र
आपल्या
देहासमपर्णाची भावना तर आहेत कारण "श्रीगुरूंशी शरणंम" ही देहाची भावभक्तीतली पहिली अवस्था आहे. देहआसक्ती नष्ट झाल्यावर
आत्मा -समर्पणाची भावभक्ती नंतर बहरून येते. 'श्रीपादराजं
शरणं प्रपद्ये' हा मन्त्र दोन तीन रूपामध्ये प्रकट
होतो. काही ठिकाणी 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ये' किंवा 'प्रपध्ये' असे ही आहे. श्रीगुरुबोध करताना जसा
उमटला तसाच मी ठेवला आहे. याचे कारण ही विशेष असेच आहे.
'प्रपद्ध्ये' मधले द आणि ध यांचा विशेष असा अर्थ
आहे. हा दत्त (द) धर्म (ध) आहे. या दत्तधर्माचा मी दास (द) आहे. 'प्रपद्ध्ये' मधील द आणि ध याचबरोबर ' ,' या जोडाक्षराचा आकृतिबंध म्हणजे हा दत्तधर्म जन्मोजन्मी, युगेयुगे प्रत्येक प्राणिमात्रामध्ये झिरपत जाणार आहेच आणि त्यानेच
आपल्या सर्व जीवनाचे कल्याण होणार आहे. तसेच 'श्रीपादराजंम' व 'शरणंम' मधला "म" आकार हा विशेष
अश्या श्रीमद्भावनेनें आला आहे. 'जं' आणि 'णं'
ही अक्षर उच्चार करताना ओंकारमधला
ओम हा दीर्घउच्चार अव्यक्त असतो. तो मुद्दामच व्यक्त रूपात दाखवण्यासाठी 'श्रीपादराजंम' मधला 'जंम'
आणि 'शरणंम मधला 'णंम'
याचा अर्थ मुद्रामंत्रात नमूद केला
आहे. शेवटी रचनाकार म्हणून "श्रीपादसूत' असे लिहिले असले तरी त्याचाही बोध
आहेच. या मुद्रामंत्रस्वरूपिणी रचनेचे कर्ताकरविता श्रीगुरु श्रीपादराजच. त्या
रचनेला शब्दबद्ध आकार दिला म्हणून मी सूत. श्रीपादसूत नामकरण ही सर्व
श्रीगुरु श्रीपादरांज यांचीच कृपा.
'श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये' या मुद्रामंत्रस्वरूपिणी रचनेला आपल्या सुंदर अक्षरब्रह्मामध्ये
कागदावर उतरविण्याचे कार्य माझी पुतणी स्वरदा हिने आपल्या अक्षरकौशल्याने प्रतित
केले आहे. 'श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये' हा मंत्रच आपल्या जीवनाला श्रीगुरुकृपाकारक ठरणार आहे.
श्रीगुरूंच्या कुरवपूर क्षेत्री श्रीगुरुसमवेत श्रीगुरुभक्तीचाच परमानंद
लाभणार आहे कारण
।। श्रीपादराजं शरणं श्रीपाद दत्त
वैभवम ।।
।।
श्रीपादराजं शरणं प्रपद्ध्ये ।।
आरती
श्रीपाद वल्लभाची
आरती दत्तात्रय प्रभूची । करूया
श्रीपाद वल्लभाची ।
भावे
ऊजळूनीया वाती । पंच प्राणांच्या ज्योती ।
पाहू
तेजोमय मूर्ती । ऊजळली दिव्य प्रभा साची ।
अशु
ही माया ।कृपेची छाया ।माऊली दीन लेकराची ।।१।।
।।श्रीपाद
श्रीवल्लभ १०८ नामावली।।
१)ॐश्रीपाद श्रीवल्लभ स्वामीने नम:
२)ॐप्रथम
संपुर्ण दत्तावताराय नम:
३)ॐ
परमात्मने नम:
४)ॐत्रिगुणातीत
निर्गुण निराकाराय नम:
५)ॐ
अनघालक्ष्मी समेत अनघाय नम:
६)ॐ
अर्धनारीश्वराय नम:
७)ॐ
सवित्रुकाठकचयन पुण्य फलोद्भवाय नम:
८)ॐ
राजमांबा बापन्नाचार्य गर्भ पुण्यफल संजाताय नम:
९)ॐसुमती
अप्पलराज नंदनाय नम:
१०)ॐ
दिव्य बालकाय नम:
११)ॐश्रीधर
रामराज श्रीविद्याधरी राधा सुरेखा सहोदराय नम:
१२)ॐ
शोडष कला प्रपुर्णाय नम:
१३)ॐ
नित्य शोडष वर्षाय नम:
१४)ॐ
पिठीकापुर नित्य विहाराय नम:
१५)ॐ
सुवर्ण पिठीकापुराधिपतये नम:
१६)ॐ
औदुंबर नित्य निवासाय नम:
१७)ॐ
व्याघ्रेश्वर चर्मासन स्थिताय नम:
१८)ॐ
अग्नीवस्त्रधराय नम:
१९)ॐ
दंडकमंडलु मालाधराय नम:
२०)ॐ
श्री राखीधराय नम:
२१)ॐअद्रृश्यहस्ताय
नम:
२२)ॐ
सुलभ साध्याय नम:
२३)ॐ
स्मृतीमात्र प्रसन्नाय नम:
२४)ॐ
परम पवित्राय नम:
२५)ॐपरम
ज्योतिये नम:
२६)ॐ
भाव प्रियाय नम:
२७)ॐ
भक्त दासानुदासाय नम:
२८)ॐ
भक्तहित कार्याय नम:
२९)ॐ
भक्त वत्सलाय नम:
३०)ॐ
दिनजनोद्धारकाय नम:
३१)ॐ
आपत बांधवाय नम:
३२)ॐ
प्रेम शांती दया करुणा मुर्तये नम:
३३)ॐ
दुष्टशिक्षकाय शिष्टरक्षकाय नम:
३४)ॐ
भवसागर तरणाय नम:
३५)ॐ
उग्रशक्ती शांतकराय नम:
३६)ॐ
निर्मल अंत:करणाय नम:
३७)ॐ
आर्तत्राण परायणाय नम:
३८)ॐ
भुत प्रेत पिशाच निर्मुलकराय नम:
३९)ॐ
घटना अघटना समर्थाय नम:
४०)ॐ
सर्वतंत्र स्वतंत्राय नम:
४१)ॐचतुर्भुज
भुवन सार्वभौमाय नम:
४२)ॐ
अनंतकोटी सुर्य तेजाय नम:
४३)ॐ
चंद्रकोटी सुशितलाय नम:
४४)ॐ
अखिलांड कोटी ब्रम्हांडनायकाय नम:
४५)ॐ
विश्वसाक्षिने नम:
४६)ॐ
कालातिताय नम:
४७)ॐ
आदीमध्यांत रहीताय नम:
४८)ॐ
सर्वग्रह दोष निवारकाय नम:
४९)ॐ
कर्म विमोचनाय नम:
५०)ॐ
योगेश्वराय नम:
५१)ॐ
योगक्षेम कराय नम:
५२)ॐ
सर्वयोगमार्ग गम्याय नम:
५३)ॐयोगदेश
योगकाल अनुग्रहाय नम:
५४)ॐ
अलभ्य योगदाय नम:
५५)ॐ
चित्रा नक्षत्राचित संप्रिताय नम:
५६)ॐ
नाम स्मरण संतुष्टाय नम:
५७)ॐ
पालखी विहार प्रियाय नम:
५८)ॐ
नित्य अन्नसंतर्पण प्रियाय नम:
५९)ॐ
पादुका पुजा प्रियाय नम:
६०)ॐ
अनघाष्टमी व्रत प्रियाय नम:
६१)ॐ
दिव्य सिद्ध मंगल स्तोत्र प्रियाय नम:
६२)ॐ
अष्टादश वर्ण प्रियाय नम:
६३)ॐ
कौतुभ प्रियाय नम:
६४)ॐ
अनुष्ठाण प्रियाय नम:
६५)ॐ
चरितामृत पारायण व्रत फलप्रदाय नम:
६६)ॐ
महदेश्वर्य प्रदाय नम:
६७)ॐ
दशमहाविद्या आराधन फलप्रदाय नम:
६८)ॐ
सत्यफलीत प्रदाताय नम:
६९)ॐ
आयुरारोग्य प्रदाताय नम:
७०)ॐ
भोगमोक्ष प्रदायकाय नम:
७१)ॐ
कलीकल्मष नाशकाय नम:
७२)ॐ
सनातन धर्मस्थापनाय नम:
७३)ॐ
पंचतत्व यज्ञ प्रारंभकाय नम:
७४)ॐ
दौ चौपाती देव लक्ष्मीगण संख्या बोधकाय नम:
७५)ॐ
विश्व चैतन्याय नम:
७६)ॐ
विश्व कुंडलीनी जाग्रृतीकराय नम:
७७)ॐ
अनंत शक्तीये नम:
७८)ॐ
अनंत ज्ञानाय नम:
७९)ॐ
महाअनंताय नम:
८०)ॐ
सर्वकार्य कारणाधराय नम:
८१)ॐ
महाकारणाय नम:
८२)ॐ
सत्य सिद्ध संकल्पाय नम:
८३)ॐ
दिव्यसत्य प्रतिष्ठीता संकल्पाय नम:
८४)ॐ
श्रीपाद महासंस्थान निर्माण संकल्पाय नम:
८५)ॐ
महासंकल्पाय नम:
८६)ॐ
महातत्वाय नम:
८७)ॐ
अत्यंत शांत मायावताराय नम:
८८)ॐ
दिव्य भव्य अवताराय नम:
८९)ॐ
योग संपुर्ण अवताराय नम:
९०)ॐ
चतुर्युगावताराय नम:
९१)ॐ
अवतार समाप्त रहित महावताराय नम:
९२)ॐ
मुग्ध मनोहर रुपाय नम:
९३)ॐ
श्रीमन् महामंगल रुपाय नम:
९४)ॐ
श्रीधर्मशास्ताय नम:
९५)ॐ
वासवी सहोदराय नम:
९६)
ॐ अरुणाचलेश्वराय नम:
९७)ॐ
अग्नी स्वरुपाय नम:
९८)ॐ
श्रीपद्मावती समेत श्री व्यंकटेश्वर स्वरुपाय नम:
९९)ॐ
त्रिमुर्ती स्वरुपाय नम:
१००)ॐ
अपरिमीत ब्रम्ह स्वरुपाय नम:
१०१)ॐ
समस्त देवी देवता स्वरुपाय नम:
१०२)ॐ
विराट स्वरुपाय नम:
१०३)ॐ
श्री दत्तात्रेयाय एकैक कलीयुग मुल अवताराय नम:
१०४)ॐ
श्रीपाद प्रथम अवतार श्री नरसिंह सरस्वतये नम:
१०५)ॐ
श्रीपाद द्वितीय अवतार श्री स्वामी समर्थाय नम:
१०६)ॐ
श्रीपाद संकल्प अवतार श्री माणिक्य प्रभवे नम:
१०७)ॐ
श्रीपाद वरफलावतार श्रीसाईनाथाय नम:
१०८)ॐ
दिगंबराय नम:
।।
सर्वम् श्रीपाद श्रीवल्लभ दिव्य चरणार् विंदार्पण मस्तु।।
Source: श्री दत्ता महाराज